मोहित देवधर
खंडाळा – राज्यातील सत्तानाट्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील रामराजे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण या तीन आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिल्याने तालुक्यातील कार्यकर्त्यांची त्रेधातिरपीट झाली आहे. त्यात वाई मतदारसंघात मकरंद पाटील यांना विरोध करणारेच आता मित्रपक्षात आल्यामुळे यपुढील राजकीय चित्र कसे असेल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे.
राज्यातील सर्वात मोठा वाई- खंडाळा- महाबळेश्वर मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक साधणारे आमदार मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर व साखर कारखान्याच्या भविष्याच्या दृष्टीने अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र ,या निर्णयामुळे पंधरा वर्षे मकरंद पाटील यांना विरोध करणाऱ्या भाजप व शिंदे गटाच्या इच्छुक उमेदवारांची गोची झाली आहे. ज्या मकरंद पाटील यांच्या विरोधात लढा चालू होता तेच आता एकत्रित सत्तेत आल्यावर येत्या 2024 च्या विधानसभेसाठी युतीमधून कोणाची वर्णी लागते हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
तत्पूर्वी भाजपकडून माजी आमदार मदन भोसले यांनीही आगामी विधानसभेच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालू केली होती. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढवली आहे. अनेक ठिकाणी शाखा वाढवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण केली आहे. मात्र आता मकरंद आबा एकत्रित आल्यावर उमेदवारीचे काय होणार असे प्रश्नचिन्ह सर्वांसमोर आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यातील राजकारणात कधीही काहीही होत आहे याची प्रचिती जनतेला आलीच आहे. आता मकरंद आबांना मित्रपक्षांकडून प्रामाणिक साथ मिळाली तर येत्या निवडणुकीत आबांची गाडी एकतर्फी सुटणार आहे. मात्र मित्रपक्षांकडून विरोधाची भूमिका घेतली गेली तर मात्र आबा चक्रव्यूहात अडकू शकतात, अशीही चर्चा लोकांमध्ये आहे.
मकरंद पाटील अजितदादांकडे गेले. या मतदारसंघात त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग मोठा आहे. पण अजूनही शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. त्यामुळे भविष्यात कुठे तरी मतांची दुफळी होण्याची शक्यता दिसत आहे.