मुंबई – भारतातील 40 पेक्षा जास्त पत्रकारांवर पेगॅसस नामक सॉफ्टवेअर वापरून पाळत ठेवण्यात येत होती, याची पुष्टी फॉरेन्सिक तपासातून झाल्याचा दावा जगभरातील 15 मीडिया संस्थांनी केला आहे. यावरुन काँग्रेसने भाजपवर टीका केली होती. त्यावरून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनमोहन सिंग यांच्या काळातही फोन टॅपिंग झाल्याचा दावा केला. याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.
मनमोहन सिंग यांच्या काळात कारवाईही करण्यात आली होती. तुम्हीही कारवाई करा, असं आव्हानच नवाब मलिक यांनी फडणवीसांना दिलं आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात फोन टॅपिंग झाल्याचा दावा भाजपकडून करण्या येत आहे. मनमोहन सिंग यांच्या काळात झालं पण ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कारवाईही झाली. आता केंद्र सरकारने यावर कारवाई करावी, अशी मागणी मलिक यांनी केली.
दरम्यान केंद्र सरकार म्हणतय, फोन हॅक झाले नाहीत. स्पायवेअर केंद्र सरकारने किंवा त्यांच्या एजन्सीने खरेदी केले की नाही ते सांगावे. पण सरकार ते सांगत नाही. 45 देशात याचा वापर केला जातो, असं भाजपकडून सांगितलं जात आहे. वापर करण्याबाबत आक्षेप नाही. मात्र हे स्पायवेअर केंद्र सरकारने खरेदी केले असेल तर सांगावं, अशीही मागणी मलिक यांनी केली.
तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन पेगसास स्पायवेअर संदर्भातील भाजपची भूमिका स्पष्ट केली. मनमोहन सिंग यांच्या काळात अनेक फोन टॅपिंग झालं. काँग्रेसच्या काळात आणि विविध राज्यांमध्ये विविध सरकारांच्या काळात फोन टॅप कसे केले गेले, याची माहितीही फडणवीस यांनी दिली.