सातारा – ऑगस्ट महिन्यात सलग 15 दिवस पडणाऱ्या संततधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. या पावसामुळे सातारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती. त्यानंतर पावसाने विश्रांती घेताच प्रशासनाने रस्त्यावरील खड्डे मुरमाने भरले होते. मात्र आता परतीच्या पावसामुळे पुन्हा हे खड्डे जैसे थे झाले आहेत.
सातारा शहरातील रस्त्यांची आधीच मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यातच मान्सून पावसामुळे रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली. पावसामुळे रस्त्यावरी डांबर उखडून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. त्यामुळे शहरातून वाहने चालवितान वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत होती.
तसेच प्रशासनाच्या नावाने वाहनधारकांमधून संताप व्यक्त होता. त्यानंतर प्रशासनाने मुरुम टाकून शहरातील रस्त्यांवर खड्डे भरुत तात्पुरती डागडुजी केली खरी. परंतु, आता परतीच्या पावसाने जोर धरल्याने खड्ड्यांमधील मुरुम पुन्हा रस्त्यावर येऊ लागल्याने रस्त्यांची अवस्था पुन्हा दयनीय झाली असून वाहनधारकांमधून संताप व्यक्त होऊ लागला आहे.