अकोले – वीरगाव (ता. अकोले) हे ऐतिहासिक माहात्म्य असणारे गाव आहे. शिवपूर्वकाळात वीरगावचे स्थानिक प्रशासन सांभाळणारी ऐतिहासिक गढी ही त्याचे निदर्शक आहे. ही गढी आता नव्या रूपात समोर येणार आहे. त्याचे उद्यानात रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यास प्रारंभही करण्यात आला आहे.
अकोले तालुक्यातील वीरगाव येथील थोरात कुटुंबियांच्या तीन एकर परिसरावर पसरलेल्या गढीच्या जीर्णोद्धाराला विजयादशमीच्या मुहूर्तावर सुरुवात झाली. नानासाहेब गोविंदराव थोरात व देवयानी नानासाहेब थोरात यांच्या हस्ते मंत्रोच्चारात शस्त्रपूजन करून येथे उद्यान निर्मितीचा संकल्प यावेळी सोडण्यात आला. या गढीची निर्मिती भुईकोट किल्लास्वरूप होते.शिवपूर्वकाळात सन 1620 ते सन 1630 या कालावधीत ही गढी बांधण्यात आली. अनेक साम्राज्य आणि राजसत्तेच्या काळातील संस्कृती आणि धार्मिक अधिष्ठान असलेल्या अनेक वास्तू निर्मित झाल्या. त्यापैकीच ही वीरगावचे जहागीरदार थोरात यांच्या संकल्पनेतून निर्मित झालेली वास्तू!
भव्य तटबंदी, उंचच उंच बुरूज, आखीव रेखीव चिरेबंदी दगडाचे बांधकाम, आजही सुस्थितीत दिसणाऱ्या टिकाऊ लाकडाचा वापर, या साऱ्या बाबी गढीत फेरफटका मारताना निदर्शनास येतात. गडकोटासारखी भव्य उंचीच्या तटबंदीत त्याकाळी थोरात कुटुंबियांचे निवासस्थन होते.जीर्ण झालेल्या भितींची रुंदी चार फुटांपेक्षा अधिक आहे. गढीतच चिरेबंदी दगडात बांधकाम केलेली विहीर सुस्थितीत सापडली आहे. तिच्यात भरपूर पाणी आहे. विहिरीच्या बाजूनेच खोलवर दोन दगडाने तयार केलेली विवरे (बळदे) सापडली, हा बहुधा संकटसमयीचा मार्ग असावा. शेकडो वर्षापूर्वीच्या या गढीची आता डागडुजी सुरू करण्यात आलेली आहे. गढी उत्खननात अनेक कलात्मक वस्तू आणि व्यायामाची साधने आढळून आली. या भव्यदिव्य गढीचे नव्या पर्यटन स्थळात रूपांतर करण्याचा थोरातांचा मानस आहे.
ध्वजारोहण व शस्त्रपूजनास उदोजी थोरात, आनंद थोरात, दिनकर थोरात, भगवान थोरात, वीरेंद्र थोरात, संजय थोरात, रमेश थोरात, अभिजित थोरात, विश्वराज थोरात, संदीप थोरात, सुरेश थोरात, रंजना थोरात, विद्या थोरात, कविता थोरात, जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, अमृतसागरचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, रामदास अस्वले, पत्रकार ज्ञानेश्वर खुळे, अण्णासाहेब थोरात, विजय देशमुख, संपत वाकचौरे, जयवंत थोरात, प्रकाश वाकचौरे, नानासाहेब वाकचौरे, नारायण कुमकर, रावसाहेब अस्वले, रामनाथ थोरात, विजयसिंह थोरात व ग्रामस्थ हजर होते.
थोरातांना मिळाली दिनकरराव पदवी
राजमाता जिजाऊसाहेबांचा छत्रपतींच्या जन्माआधी मोगलांनी पाठलाग केला असता त्यांना वीरगावच्या थोरातांनी गढीत संरक्षण दिल्याची माहिती मिळाली. त्याच रात्रीला जिजाऊसाहेबांना थोरातांच्या पूर्वजांनी सूर्योदय होण्यापूर्वी शिवनेरीकडे पोहच केल्याचा इतिहास सांगितला जातो आहे.त्यामुळे वीरगाव येथील जीवावर उदार झालेल्या थोरातांना ‘दिनकरराव’ ही पदवी मिळाली. स्वराज्य स्थापनेच्या कालखंडातही छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श या गढीला झालेला आहे.