अमरावती – आंध्र प्रदेशातील रेपल्ले रेल्वेस्थानकावर एका गरोदर महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असताना राज्याच्या नव्या गृहमंत्री तनिती वनिता यांनी केलेल्या विधानामुळे आगीत तेल ओतण्याचेच काम केले आहे. आरोपींचा तसा काही (बलात्काराचा) उद्देश नव्हता. मात्र अनपेक्षित स्थितीत ती घटना घडली असे त्यांनी म्हटल्यामुळे त्या वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.
यापूर्वी याच राज्यातील विझाग येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. तेव्हाही मुलीच्या सुरक्षेची जबाबदारी तिच्या आईचे असते असे वादग्रस्त विधान करून त्यांनी रोष ओढवून घेतला होता.
आताच्या बलात्काराच्या घटनेचे खापर त्यांनी मनोवैज्ञानिक स्थिती आणि गरीबीवर फोडले. रेल्वे स्थानकावर बलात्काराची घटना घडली तेव्हा आरोपी नशेमध्ये होते. पीडितेच्या पतीला लूटण्याच्या इराद्याने त्यांनी हल्ला केला होंता. मात्र तिने हस्तक्षेप केला आणि बलात्कार झाला. अशा घटना घडत असतात. पर्याप्त पोलीस दल नव्हते म्हणून हे घडले असे म्हणता येऊ शकत नाही. अशा घटना आकस्मिक घडतात. तरीही स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, गृहमंत्र्यांच्या विधानाला तेलगू देसम या विरोधी पक्षाने जोरदार हरकत घेतली आहे. त्या गरोदर महिलेवर बलात्कार केला गेला. तीला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या पतीला मारहाण करण्यात आली असे या पक्षाने म्हटले आहे.