हिमांशू
इकडे शाळेची घंटा वाजत नाही म्हणून लहानगे जीव कोमेजून चाललेत आणि तिकडे अमेरिकेत कोविड रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत चाललीय. केरळची रुग्णवाढ आंध्र आणि तेलंगणमध्येही दिसू लागलीय.
दुसरी लाट केव्हा संपेल आणि तिसरी केव्हा सुरू होईल, हे कळणारसुद्धा नाही असं माहीतगार सांगू लागलेत. दीड वर्ष उलटून गेलं तरी जगणं रुळावर येईना. अनेकांना तर आजारानं मरायचं किंवा भूकेनं, एवढे दोनच पर्याय दिसतायत. कधी हे संकट संपणार आणि कधी सगळं पहिल्यासारखं होणार, हा एकच प्रश्न संपूर्ण जगाला पडलाय.
अर्थात, या प्रश्नामागे अर्थव्यवस्थेची चिंता सर्वाधिक आहे आणि ते स्वाभाविकच आहे. परंतु सगळं पहिल्यासारखं झालं तरी आपण पुढं जाण्यासाठी कोणता मार्ग निवडणार, हे अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. कारण पृथ्वीचा आणि मानवजातीचा इथून पुढचा प्रवास “संकटाकडून संकटाकडे’ असाच असणार आहे.
हे कुण्या एकट्याचं मत नाही, तर 60 देशांमधल्या 200 शास्त्रज्ञांनी शोधून काढलेलं हे वास्तव आहे. “अ कोड रेड फॉर ह्युमॅनिटी’ म्हणजे “मानवजातीसाठी धोक्याची लाल पातळी’ या नावानं साडेतीन हजार पानांचा अहवाल या शास्त्रज्ञांनी दिलंय. तंत्रज्ञानाचा डांगोरा तर आपण पिटतोच; पण तंत्रज्ञानाबरोबर विज्ञानसुद्धा आपल्याला हवंय का? हवं असल्यास पर्यावरणशास्त्र हेही विज्ञान आहे आहे, हे आपल्याला मान्य आहे का?
आपल्याकडे पुरानं संसार वाहून गेले आणि डोंगराचे कडे कोसळून गावं गाडली गेली. पण भरपाई किती मिळणार, या प्रश्नापुढे चर्चा गेलीच नाही. कॅनडात “हीट डोम’ नावाच्या संकटानं दाणादाण उडवली. सरासरी तापमान 16.4 असणाऱ्या कॅनडात पारा 49.6 अंशांवर चढला. “हीट डोम’ म्हणजे हवेचा असा पट्टा, जिथे बाहेरून थंड हवा येऊ शकत नाही आणि आतली उष्ण हवा बाहेर जाऊ शकत नाही.
कॅनडात माणसं तडफडून मरण पावली. उष्णतेमुळे जंगलांत आगी लागल्या, त्या विझता विझेनात. गावंच्या गावं होरपळली. तिकडे न्यूझीलंडमध्ये अचानक 8 इंचांपेक्षा जास्त बर्फ पडला आणि लोकांना घराबाहेर पडायला बंदी घातली गेली. ढगफुटी, वादळं, गारपीट, उष्णतेच्या लाटा, अतिहिमवृष्टी, अवकाळी पाऊस, दुष्काळ ही संकटं आता अनेक पटींनी वाढणार आहेत.
गेल्या वीस-तीस वर्षांतच ही संकटं अधिक वाढलीत- संख्येनं आणि तीव्रतेनंही! आपल्याच देशात 15 वर्षांत अशी 310 संकटं आलीत. “अ कोड रेड फॉर ह्युमॅनिटी’ अहवाल असं सांगतो की, पुढील वीस वर्षांत पृथ्वीचं तापमान दीड अंशांनी वाढेल आणि ही संकटंही! समुद्राचा स्तर वाढेल आणि मुंबईसह भारतातली 12 शहरं 3 फूट पाण्याखाली जातील. बुडणाऱ्या गावांची तर गणतीच नसेल.
पृथ्वीच्या ज्या भागांत वर्षभर पाऊस पडतो, त्यांना उच्च अक्षांशाची क्षेत्रं म्हणतात. अशा मोजक्याच भागात प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळेल आणि सतत पुरासारखीच परिस्थिती राहील. अन्य भागांत मात्र दुष्काळ असेल, असं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. पूर्वी 50 वर्षांतून एकदा येणाऱ्या आपत्ती यापुढं दरवर्षी येतील. कोविडचं संकट मानवनिर्मित आहे की नाही, कोण जाणे! पण हे संकट शंभर टक्के मानवनिर्मित असणार आहे… अर्थात, झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं कोण करणार?