हिमांशू
आज वसुबारस आणि धनत्रयोदशी आहे. परंतु फटाके कालपासूनच सुरू झालेत. विशेष म्हणजे दिवाळीने यावर्षी सर्वांना फटाके फोडण्याची संधी दिलीय. काल ज्या प्रकारे टीव्हीच्या पडद्यावरचे आकडे सारखे बदलत होते, ते पाहून अनेकांचा जीव खाली-वर होत होता. मुळात वाचून होण्यापूर्वी आकडे बदलण्याची सवय अनेक वाहिन्यांना असल्यामुळे अनेकांचे डोळे दुखूही लागलेत. शिवाय कुणाचे शंभर, कुणाचे एकशे वीस तर कुणाचे एकशे तीस विश्लेषक सातत्यानं निवडणुकीच्या निकालाचा अर्थ लावू पाहात होते. तेही अतिशय त्रासदायक होतं. कारण विश्लेषणसुद्धा अर्ध्या-अर्ध्या तासानं बदलावं लागत होतं. शेवटी संपूर्ण राज्याचं चित्र डोळ्यासमोर न ठेवता एकेका मतदारसंघाचं विश्लेषण सुरू झालं. त्यातसुद्धा अनेक ठिकाणी शेवटपर्यंत पारडं वरखाली होत होतं.
अखेर दुपारनंतर पत्रकार परिषदा सुरू झाल्या आणि विश्लेषकांचा सूर सौम्य झाला. मुळात आपल्या राज्यात एवढ्या संख्येनं राजकीय विश्लेषक आहेत, याचाच आम्हाला अभिमान वाटला. परंतु या अभिमानाचं रूपांतर उत्तरोत्तर आश्चर्यात झालं. कारण दोन-तीन दिवसांपूर्वी “एक्झिट पोल’ म्हणून दाखवले गेलेले आकडे डोळ्यासमोर येऊ लागले. ते जर सर्वेक्षण मानलं तर सॅम्पल चुकला, असं म्हणावं लागेल. परंतु विश्लेषण नावाचा प्रकार तेव्हापासूनच सुरू झाला होता. परंतु सर्वेक्षणं आणि विश्लेषणं या साऱ्याच्या पलीकडे जाणारा एक संमिश्र निकाल आपल्याला काल संध्याकाळी महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवला.
आता विश्लेषणाची वेळ राजकीय पक्षांच्या नेत्यांची होती; परंतु सर्वेक्षणाच्या आकड्यांमुळं नेतेही तयारीत नव्हते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेपासून या विश्लेषणांना सुरुवात झाली. परंतु बऱ्याच जणांना उत्कंठा होती ती उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेविषयी. पवारांनी अत्यंत सौम्य शब्दांत सद्य राजकीय स्थितीचं विश्लेषण केल्यानंतर उद्धव ठाकरे जे बोलले, त्यातून अनेकांना “हीच ती वेळ’ या स्लोगनचा अर्थ व्यवस्थित समजला!
महाराष्ट्रातल्या लोकांनी अत्यंत डोळसपणे मतदान केलंय आणि विधानसभेत सक्षम विरोधी पक्ष असायलाच हवा, ही त्यांची वाक्यं नेमकी कुणाची विकेट घेणारी होती, हे समजणाऱ्यांना समजलं. सत्तेत राहूनसुद्धा पाच वर्षं विरोधकाची भूमिका आपल्या पक्षानं का बजावली, हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगून टाकलं. नंतर सत्तेत असताना कसं राहावं लागतं, हे परखडपणे सांगून त्यांनी “स्ट्रेट ड्राइव्ह’सुद्धा मारला. मुख्यमंत्र्यांची बहुप्रतीक्षित पत्रकार परिषद सगळ्यात शेवटी झाली. त्यांचं लॉजिक जबरदस्त! आकडे काहीही सांगू दे; परंतु आपल्या पक्षाचा “स्ट्राइक रेट’ कसा वधारला आणि मतांची टक्केवारी कशी वाढली, हे त्यांनी आकडेवारीनिशी पटवून दिलं. मग अचानक “समोर कुणी पहेलवानच नाहीये,’ असं आपणच काही दिवसांपूर्वी म्हणालो होतो, हे त्यांना आठवलं.
एक मात्र खरं. “वेळ’ काय असते, हे दाखवून देणारी ही निवडणूक ठरली. आम्हाला गृहित धरता येणार नाही, असं मतदारराजानं सगळ्यांनाच सांगून टाकलं. बंडखोरीमुळं कुणाचा किती तोटा झाला, कुठे काय कमी पडलं, कुणी कुणाला “आतून’ मदत केली, कुणाची “छुपी मैत्री’ होती, या चर्चा होत राहतील. परंतु विश्वासानं टाकलेले फासे प्रत्येक वेळीच डाव जिंकून देतात असं नाही, हा या निवडणुकीचा संदेश आहे. कालाय तस्मै नमः