मुंबई: मुंबईचा नवोदित खेळाडू शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांच्यासह युजुर्वेंद्र चहल यांना बांगलादेशविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. शिवम दुबे याने देशांतर्गत स्पर्धेत केलेल्या सरस कामगिरीमुळे त्याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे.
कर्णधार विराट कोहली याला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली असून दोन सामन्यांच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेला व्हाईटवॉश देणाऱ्या संघात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. कोहलीच्या गैरहजेरीत रोहित शर्मा टी-20 मालिकेसाठी संघाचे नेतृत्व करेल. या मालिकेला 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्याने सुरुवात होईल.
शार्दुल ठाकूरला संघात स्थान देण्यात आले असून रवींद्र जडेजालादेखील विश्रांती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराह तसेच दिल्लीचा मध्यमगती गोलंदाज नवदिप सैनीचा संघनिवडीसाठी विचार करण्यात आला नाही. या दोघांनाही दुखापतीतून सावरण्यासाठी आणखी काही काळ लागणार आहे. मात्र, दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने संघात पुनरागमन केले आहे.
बांगलादेशचा संघ येणार प्रमुख खेळाडूंनी केलेल्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यात येतील हे आश्वासन बांगलादेश क्रिकेट मंडळाने दिल्यानंतर पुकारलेला संप खेळाडूंनी मागे घेतला आहे. त्यामुळे बांगलादेशचा संघ पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार भारत दौऱ्यावर येणार आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू व माजी कर्णधार शकीब अल हसन याच्या नेतृत्वाखाली अनेक क्रिकेटपटूंनी आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत भारत दौराच काय कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही असा पवित्रा घेत संप पुकारला होता. त्यामुळे त्यांचा संघ भारत दौरा करणार का नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मंडळाच्या अध्यक्षांनी आश्वासन दिल्यानंतर हा संप मागे घेण्यात आला.