नांदेड- लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघातून केवळ पाच हजारांचे मताधिक्य मिळाले व माझा लोकसभेत पराभव झाला. त्याच भोकर मतदारसंघातून जवळजवळ एक लाख मताधिक्याने जनतेने मला निवडून दिले. यावरून जनतेला मी महाराष्ट्रात हवा होतो, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर येथे व्यक्त केली.
भोकर मध्ये द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जनतेने चपराक लगावली असल्याचा टोला त्यांनी लगावला.
भोकरच्या मतदारांनी 2009च्या पुनरावृती केली आहे. भोकर मतदारसंघातील जनता व माझे नाते अतुट असे आहे.
निवडणुकीत विकासाची जी-जी आश्वासने दिली होती ती पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पाच वर्षात मराठवाडा, नांदेड यासह भोकरच्या विकासाकडे आपले विशेष लक्ष असेल, असे सांगतानाच मतदारसंघातील जनता व कॉंग्रेस कार्यकर्ते यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.
नांदेड जिल्ह्यात कॉंग्रेस पक्षाला जरी चार जागा मिळाल्या असल्या तरी हे यश अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे सांगताना नांदेड दक्षिणची जागा आल्याचा आनंद झाला, पण उत्तरची जागा केवळ मतविभाजनामुळे गमावल्याचे आपणास दुःख असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रामध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेच्या प्रक्रीयेत काहीही घडू शकते याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.