– हिमांशू
सार्वजनिक जीवनात सक्रिय असणारी, एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असणारी महिला एके दिवशी अचानक बेपत्ता होते. तिचा फोनही बंद झाल्याचं कुटुंबियांच्या लक्षात येतं. शोधाशोध करूनही ती सापडत नाही म्हणून पोलिसांकडे तक्रार येते. नागपूरहून जबलपूरला गेलेल्या या महिलेची हत्या झाल्याचं तपासात उघड होतं. संशयिताच्या घरात रक्ताचे डाग आढळतात. ते बेपत्ता महिलेचेच असल्याचं स्पष्ट होतं. तिचा मृतदेह मोटारीच्या डिकीत लपवून हिरन नावाच्या नदीत फेकल्याची माहिती संशयितच तपासादरम्यान देतो. मग तिच्या मृतदेहाची शोधाशोध सुरू होते. घटनास्थळापासून जवळच संगम असल्यामुळे मृतदेह नदीप्रवाहाबरोबर खूप लांब गेला असण्याची शक्यता वर्तविली जाते. दरम्यानच्या काळात हत्येच्या संभाव्य कारणाबद्दल माध्यमांत चर्चा होते.
“हनी ट्रॅप’सह वेगवेगळ्या शक्यता तपासल्या जाऊ लागतात. तब्बल 14 दिवसांनंतर घटनास्थळापासून तीनशे किलोमीटर अंतरावर एका महिलेचा मृतदेह सापडतो. तो बेपत्ता महिलेचाच असल्याचं पोलिसांना वाटतं; पण महिना उलटून गेल्यावर डीएनए चाचणीचा अहवाल “निगेटिव्ह’ येतो. म्हणजे, तो मृतदेह बेपत्ता महिलेचा नाहीच. इथे दोन महत्त्वाचे प्रश्न उभे राहतात. बेपत्ता महिलेचा मृतदेह सापडणार की नाहीच? दुसरा प्रश्न म्हणजे, जिचा मृतदेह सापडला ती महिला कोण? भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात एक ऑगस्टपासून आजअखेर अनेक “ट्विस्ट’ आले. विविध शक्यतांचा ऊहापोह झाला. प्रसिद्ध व्यक्ती बेपत्ता असतानाचा हा घटनाक्रम इतका अस्वस्थ करणारा…
मग साहजिकच एक प्रश्न मनाला सतत टोचू लागतो. बेपत्ता होणाऱ्या सामान्य मुलींचं आणि महिलांचं काय? पाठीला डोळे फुटतात आणि सना खान बेपत्ता झाल्या, त्याच्या आदल्याच दिवशीच्या म्हणजे 31 जुलैच्या बातमीतील मजकुराची तीव्रता लक्षात येते. असे असंख्य संभाव्य घटनाक्रम दिसू लागतात. अवघ्या तीन वर्षांत आपल्या देशात 13 लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या. यातल्या जवळजवळ साडेदहा लाख मुली सज्ञान आहेत तर अडीच लाख अल्पवयीन.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाची ही आकडेवारी. 1 लाख 78 हजार 400 महिला आपल्या महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्यात. ही आकडेवारी 2019 ते 2021 या कालावधीतील आहे हे खरं; पण याही वर्षी पहिल्या तीन महिन्यांत 5 हजार 510 महिला एकट्या महाराष्ट्रातून बेपत्ता झाल्यात. दररोज सरासरी 70 महिला बेपत्ता होतायत. मुलगी अल्पवयीन असेल तर पोलीस अपहरणाची तक्रार दाखल करून त्या दिशेनं तपास करतात. सज्ञान असेल तर वेगवेगळ्या शक्यतांचा विचार केला जातो. यावर्षी महाराष्ट्रातून बेपत्ता झालेल्या महिलांच्या 5 हजार 510 कहाण्या असतील. या सगळ्या कहाण्यांचे पदर उलगडल्यावर काय-काय दिसेल?
प्रेमविवाहाला विरोध असल्यामुळे घर सोडणाऱ्या मुलींची संख्या बरीच मोठी असेल हे खरं; पण सगळ्याच मुलींच्या आणि महिलांच्या कहाण्या “हॅपी एन्डिंग’वाल्या असणार नाहीत. काहीजणी सेक्स रॅकेटमध्ये अडकल्या असतील, काहींची तस्करी झाली असेल, काहीजणींनी जगाचा निरोपही घेतला असेल. काहीजणींनी घरातल्या अन्यायाला कंटाळून किंवा भांडून घर सोडलं असेल. बऱ्याच अगतिक झाल्या असतील आणि त्यांच्या अगतिकतेचा कुणीतरी गैरफायदाही घेतला असेल! असे विचार मनात येऊ लागले, की समस्येच्या गांभीर्यानं आपण हतबुद्ध होतो.