घराच्या छतावर उभारलेल्या उंच लोखंडी पाइपवर ऍल्युमिनियमच्या नळ्यांचा ऍन्टेना बसवलेला असायचा, त्याच काळात ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवरच्या क्रिकेट सामन्यांनी आम्हाला आकर्षित केलं. टीव्हीच्या पडद्यावर चित्र कमी आणि मुंग्याच जास्त दिसायच्या. किंबहुना मुंग्यांच्या गर्दीतून चालणाऱ्या किंवा धावणाऱ्या खेळाडूच्या बाह्य आकृतीवरून “हा कोण असावा’ याचा अंदाज घ्यावा लागत असे. अर्थात, त्याकाळी इतके अडथळे असले तरीही आजकालच्या डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचे कार्यक्रम पाहणाऱ्यांनी ही मौज “मिस’ केली असंच आम्ही म्हणू! कुणी याला “स्मरणरंजन’ म्हणून आमची खिल्ली उडवली तरी चालेल; पण आम्ही त्यावेळी पाहिली ती “क्रिकेट’च होती, हे आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो. सामने, विशेषतः पाच दिवसांचे कसोटी सामने त्याकाळी अत्यंत संथ चालायचे आणि बहुतांश सामन्यांचा निकालच लागत नसे.
आता जवळजवळ प्रत्येक सामन्याचा झटपट निकाल लागतो; पण… तो खरोखरच “निकाल’ असतो का? माफ करा; पण एखादी धक्कादायक माहिती ऐकल्यावर मेंदूत शंकासूर शिरणं स्वाभाविक आहे. क्रिकेटचे जेवढे म्हणून आंतरराष्ट्रीय सामने होतात आणि लाखो चाहते ते आनंदानं पाहत असतात, ते सगळेच्या सगळे सामने “फिक्स’ असतात, असा जबाब जर फिक्सिंगच्या प्रकरणात अटक झालेला एखादा सट्टेबाजच देऊ लागला, तर क्रिकेटच्या अस्सल चाहत्याला केवढा मोठा धक्का बसेल, हे वेगळं सांगायला नको.
क्रिकेटमध्ये “मॅच फिक्सिंग’ चालतं हे आपल्याला वीसेक वर्षांपूर्वी समजलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज कर्णधार हॅन्सी क्रोनिए हा अशा फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता आणि त्याला शिक्षाही झाली होती. पुढे जेव्हा तो विमान अपघातात मृत्युमुखी पडला, तेव्हा त्याच्याविषयी फार मोठे लेख वगैरेही छापून आले नव्हते. त्यावेळी फिक्सिंगचं जे रॅकेट उघडकीला आलं होतं, त्यात संजीव चावला हे नाव प्रामुख्यानं समोर आलं होतं. हा आंतरराष्ट्रीय सट्टेबाज म्हणून ओळखला जातो. त्याला ब्रिटनने नुकतंच भारताच्या स्वाधीन केलंय आणि चौकशीदरम्यान त्यानं धक्कादायक खुलासा केलाय. क्रिकेटचं आणि अंडरवर्ल्डचं कनेक्शन अजूनही कायम असल्याचं सांगून तो म्हणाला, “अंडरवर्ल्डमधले माफिया क्रिकेटच्या सामन्यांचं फिक्सिंग करतात.
लोक टीव्हीच्या पडद्यावर सामना पाहत राहतात; पण त्याचा दिग्दर्शक अंडरवर्ल्ड डॉन असतो.’ हे ऐकल्यावर असं वाटलं की, टीव्हीवर जेव्हा स्पष्ट चित्र दिसत नव्हतं, तेव्हाच क्रिकेटचं चित्र अधिक स्पष्ट होतं. आता चेंडूची शिवणसुद्धा टीव्हीवर स्पष्ट दिसते; पण क्रिकेट अस्पष्ट झालीय. चावलाच्या सांगण्यात अतिशयोक्तीही असू शकेल; पण एखाद्या शैलीदार फटक्यानंतर किंवा विकेटनंतर वाजणाऱ्या टाळीमागची उत्स्फूर्तता कमी करण्याची क्षमता त्याच्या जबाबात निश्चितपणे आहे, असंच म्हणावं लागेल.
आपल्या जबाबात संजीव चावलाने असंही सांगितलंय, की हा सगळा भीतीचा खेळ आहे. आपल्या मनासारखा निकाल झाला नाही, तर ही डॉन मंडळी एखाद्याचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नाहीत. चावलाने मॅच फिक्सिंग करणाऱ्या तीन मित्रांची नावं सांगितली; पण अंडरवर्ल्डमधले कोण-कोण हे काम करतात, याविषयी त्याने “ब्र’ उच्चारला नाही, यावरूनच भीतीचा अंदाज येतो. क्रिकेट बेभरवशाचा खेळ आहेच; पण सामन्याचा निकाल ही एवढी अविश्वसनीय घटना ठरायला नको होती.