पारनेर (प्रतिनिधी) -तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील 67 लाख रुपये खर्चाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम अनेक दिवसांपासून अपूर्ण आहे. गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना देखील काम अपूर्ण ठेवणाऱ्या ठेकेदाराची अद्यापपर्यंत ग्रामपंचायतीकडून कुठलीही तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली नसल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न तर होत नाहीना, अशी शंका यानिमित्ताने ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.
पिंपरी जलसेनमधील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरविण्यासाठी व गावाला वर्षभर शाश्वत पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी शासनाकडून राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर करण्यात आली. यासाठी 67 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला. सदर कामाचा कार्यारंभ आदेश 8 मार्च 2019 रोजी मिळाला. त्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरुवात झाली. मात्र काम अर्धवट असतानाच ग्रामपंचायतीकडून सदर योजनेचे लोकार्पण 3 फेब्रुवारी 2020 रोजी करण्यात आले. लोकार्पण होऊन जवळपास 4 महिने होत आले असताना देखील अद्याप संबंधित ठेकेदाराने या योजनेचे काम पूर्ण केलेले नाही. अपूर्णावस्थेत असणाऱ्या कामाचे लोकार्पण केले कसे? व ग्रामस्थांना योजनेचे पाणी मिळणार कधी ? या विषयावर दैनिक प्रभातने प्रकाश टाकल्यानंतर जिल्हा परिषद कडून कार्यकारी अभियंता गावडे यांनी कामाची पाहणी केली.
त्यावेळी देखील काम अपूर्णावस्थेत असल्याचे प्रत्यक्ष स्थळ पाहणी वरून दिसून आले. प्रत्यक्षदर्शी काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत असताना देखील काम 80 टक्के पूर्ण झाले असून, त्या कामाचे बिल देखील काढले असल्याचे उपअभियंता प्रदीप पंडित यांनी पाहणी करण्यासाठी आलेल्या कार्यकारी अभियंता गावडे यांच्यासमोर ग्रामस्थांना सांगितले. याबाबत कार्यकारी अभियंता गावडे यांनी पाहणी केली आहे. ते काय भूमिका घेतात व काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.