– हिमांशू
आता खरोखर मजा येणार. आपण कोणत्या उमेदवाराला मत दिलं होतं? मतदान केलं तेव्हा तो कोणत्या पक्षात होता? त्या पक्षावर आज नेमका कोणत्या गटाचा हक्क आहे? तो हक्क टिकणार की दुसर्या गटाला मिळणार? हा निर्णय नेमका कधी होणार? निवडणुकीच्या आधी की नंतर? निवडणुकीच्या आधी झाला तर लोकसभा निवडणुकीच्या आधी की विधानसभा निवडणुकीच्या आधी? निवडणुकीच्या नंतर निर्णय झाला तर कोणत्या निवडणुकीनंतर? तोपर्यंत आपण काय करायचं? माणूस बघून बटण दाबायचं की चिन्ह बघून? चिन्ह बघून बटण दाबलं तर ते कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला जाईल? आपण बटण दाबल्यानंतर चिन्ह उमेदवाराला सोडून गेलं तर?
किंवा आपण निवडून दिलेला उमेदवारच चिन्ह सोडून गेला तर? उमेदवार चिन्हासह दुसरीकडे गेला तर? कितीतरी मनोरंजक प्रश्न समोर आ वासून उभे आहेत. थर्टीफर्स्टची पार्टी कुठे करायची? हा जटिल प्रश्न एकवेळ सुटेल, पण हे प्रश्न सुटणार नाहीत, अशी तजवीज करून ठेवण्यात आली आहे. शिवाय, थर्टीफर्स्टच्या पार्टीपेक्षा अधिक अंमल या प्रश्नांचा पडलाय. सध्याच्या तडजोडी लोकसभेच्या निवडणुकीपर्यंतच अंमलात असतील आणि नंतर चित्र बदललेलं असेल, असा दावा करून कुणीतरी काळजाचा ठोका चुकवतो, ते वेगळंच! एकंदर राजकारणाचा विचार करता आपण एस्सेल वर्ल्डमधील रोलर कोस्टरमध्ये बसलो आहोत, असा भास व्हावा अशी परिस्थिती आहे. कधी कोणतं वळण येईल आणि कधी आपण उलटे होऊ याचा अंदाज लागेनासा झालाय.
त्यात आता आणखी काही मनोरंजक प्रश्नांची भर पडलीय. ते प्रश्न येणेप्रमाणेः दाऊद इब्राहीम नेमका कोण आहे? त्याचे किती निकटवर्तीय या देशात राजरोस फिरत आहेत? ते दाऊदचे केवळ नातलग आहेत की व्यवसायबंधू? तसं असेल तर ते बाहेर कसे? बाहेर आहेत तर कुणाच्या कृपेनं? त्यांचे कोणत्या पक्षातील नेतेमंडळींशी संबंध आहेत? किंबहुना कोणत्या पक्षातील नेत्यांशी संबंध नाहीत? एकाने फोटो दाखवला की दुसरा व्हिडिओ दाखवतो, त्या दोहोतलं काय खरं? फोटो की व्हिडिओ?
दोन वर्षांपूर्वीच्या लग्नाचा व्हिडिओ आणि त्याची बातमी नेमकी आजच पुन्हा का उगाळली जातेय? वर्हाडी लोकांमध्ये काही पोलीस अधिकारी आहेत आणि त्यांची चौकशी होईल, असं आश्वासन त्यावेळी दिलं होतं त्याचं काय झालं? त्याच लग्नाला उपस्थित असलेल्या नेतेमंडळींकडे बोट दाखवलं जातंय, ते इकडच्या नेत्यांना वाचवण्यासाठी की तिकडच्या नेत्यांना अडकवण्यासाठी? एकाने गाय मारली की दुसर्याने वासरू मारायचं, असा हा प्रवास अखेर कुठवर चालणार? सत्य बाहेर येऊन कारवाई वगैरे होणार की नुसताच आरडाओरडा होणार?
महाराष्ट्राचं राजकारण इतक्या रसातळाला कधीच गेलं नव्हतं, वगैरे शेरेबाजी तथाकथित बुद्धिवादी करत असले तरी बहुसंख्य मनोरंजनप्रेमींच्या मते राजकारण इतकं करमणूकप्रधान कधीच झालं नव्हतं. आता जी मजा येईल, ती राजकारणाचा स्तर वगैरे तपासणार्यांना काय कळणार? एक ड्रग रॅकेट उघडकीला येतं व सगळं वातावरण ढवळून निघतं, यालाच म्हणतात टीआरपीमूलक राजकारणाची जादू! जे गाजतं त्याला नाकं मुरडण्याची काहीजणांना सवयच जडलीये. प्रश्नामागून प्रश्न आणि प्रश्नांचा चक्रव्यूह, हेच खरं राजकारण!