– हिमांशू
जिंकल्यावर गळ्यात घालतात त्याला हार का म्हणतात, हा प्रश्न अगदी लहानपणापासून सतावतोय. भाषेचं एकंदर ज्ञान, वाचन आणि ज्ञानी माणसांचा सहवास कमी असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर कदाचित आम्हाला अद्याप मिळालं नसेल. मेंदूच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसलेला हा प्रश्न अधूनमधून उगीचच उसळी घेतो आणि उत्तर सापडत नसल्यामुळे अस्वस्थ व्हायला होतं. हल्ली हा प्रश्न वारंवार सतावू लागला आहे. त्याचं कारण म्हणजे हारांचं वाढलेलं वजन. एकतर “त्रिशूळ’ सरकारात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असूनसुद्धा महाराष्ट्र अजूनही समाधानी झालेला दिसत नाही. त्यामुळे “भावी मुख्यमंत्री’ असा मजकूर लिहिलेले फलक हल्ली जिकडं तिकडं पहायला मिळतात. संबंधिताला विचारावं तर उत्तर मिळतं, “कार्यकर्त्यांची इच्छा आहे.’
कार्यकर्ते भाबडे असतात हो! प्रत्येकाला आपापला नेता राज्याच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसावा असं वाटणारच, कारण या भाबड्यांची स्वप्नं तितकीशी भाबडी नसतात. साहजिकच, आपल्या नेत्याला ताकद देण्यापुरती त्यांची जबाबदारी मर्यादित राहात नाही; तर ताकद “दाखवावी’ लागते. सध्याच्या बाजाराधिष्ठित जगात ताकद दाखवण्याची जी असंख्य साधनं उपलब्ध झालीत त्यातलं हार हे एक महत्त्वपूर्ण साधन आहे. हे हार साधेसुधे नसतात. ते गळ्यात घातले जात नाहीत, कारण या पहिलवानी हारांचं वजन इतकं असतं की बघूनच स्पॉंडिलायटिसचा त्रास सुरू व्हावा. या हारांचं वजन 20-20 क्विंटल असतं म्हणे!
या प्रचंडं हारांचे दोन प्रकार असतात. एक व्यासपीठीय हार आणि दुसरा रोड शो हार. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ही व्यासपीठीय हारांची जननी असावी. एकच भलामोठा हार 10-12 लोकांच्या गळ्यात घालायचा (म्हणजे त्यांच्याभोवती नुसता धरायचा) आणि फोटोसेशन करायचं असा प्रघात आहे. नाजूक फुलांच्या या अजस्र अजगरी हारांचा शोध दक्षिणेकडील राज्यांना सर्वप्रथम लागला असावा. विशेषतः तमिळनाडूत असे महाकाय हार पूर्वीपासून पहायला मिळतात. तिकडचं एकंदर राजकारणच तिकडच्या चित्रपटांसारखं भडक. जे करायचं ते “लार्जर दॅन लाइफ’ असलं पाहिजे.
रजनीकांत वगैरे मंडळींचे जे प्रचंड कटआउटस् तिथं उभारले जातात तेही आता आपल्या राज्यात आलेत. गोविंदाच्या दिवशी असाच एक भव्य कटआउट उभा करून त्याच्या उंचीची दहीहंडी मुंबईत रचण्यात आली. असो तर मुख्य विषय हारांचा आहे. रोड शो हारांबाबत बोलायचं झाल्यास ते न्यूजवाल्यांच्या कॅमेऱ्यांसाठीच खास बनवले जातात. रस्त्यात मध्यभागी हे भेंडोळे टांगले जाते आणि उघड्या मोटारीतून येणाऱ्या नेत्याची गर्दीसह छबी दुसऱ्या बाजूनं कॅमेऱ्यात कैद केली जाते. नेता वजनदार आहे हे अधोरेखित करून देणं हे त्या हारांचं मुख्य काम!
जी गोष्ट हारांची तीच फुलांची! पूर्वी दिग्वीजयी होऊन परतलेल्या राजाचं स्वागत फुलं उधळून केलं जात असे. तसंच आता नेत्याचं स्वागत केलं जातं. फरक इतकाच की पूर्वी सुवासिनींचे नाजूक हात पुष्पवृष्टी करायचे, आता जेसीबीचे प्रचंड यांत्रिक हात करतात. जेसीबीच्या प्रतिकात्मकतेविषयी स्वतंत्र चर्चा करावी लागेल. तूर्त इतकंच, स्वरुप बदललं तरी आजही जिंकणाऱ्याचं स्वागत हारानेच होतं आणि हार-जीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत याचं भान स्वागत स्वीकारणाऱ्यानं बाळगायला हवं.