“…म्हणून शाळेत जायची भीती वाटते,’ असं सांगताना एखाद्या दुर्गम गावातल्या इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुली दचकत असतील आणि आपल्या बाबतीत नेमकं काय घडलंय, हेही त्यांना सांगता येत नसेल तर ऐकणाऱ्यांनी त्यांच्याइतकं लहान व्हायला पाहिजे. “शिक्षक म्हणजे आमच्यासाठी देव आहे… आम्हाला या जंगलाच्या बाहेर पडायचंय; पण पोरं शिकली तरच हे शक्य आहे,’ असं जंगलात हयात घालवलेली एखादी म्हातारी म्हणते, तेव्हा त्यामागच्या वेदना जाणून घेतल्या पाहिजेत.
जिथं शिक्षक आणि शिक्षण दोन्ही दुर्मिळ आहे, तिथं आपली तिसरी पिढी तरी शिकली पाहिजे, असं ज्यांना मनापासून वाटतं, त्यांचं दैनंदिन आयुष्य किती खडतर असेल हेही समजून घेतलं पाहिजे. अशा भागात बदली होणं म्हणजे शिक्षकांसाठी शिक्षाच मानली जाते. शहरातून दोन शिक्षक येतात; पण आळीपाळीनं! एक आला तर दुसरा येत नाही आणि दुसरा आला तर पहिला दांडी मारतो. ग्रामस्थ म्हणतात, “तरीही आम्ही त्यांचे नखरे सहन केले; पण…’ हा “पण’ खूपच भीषण आहे. जे ऐकणंही शक्य नाही, ते मुली सहन करत होत्या.
अकोला जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात हे सगळं दोन महिने सुरू होतं. चार कोवळ्या मुली या अत्याचाराला बळी पडल्या. शिक्षकांकडे बघितलं की पोरींना फक्त दहशत दिसायची. दोन शिक्षकांनी नेमकं काय केलं, हे सांगता यायचं नाही. घडल्या प्रकारानंतर पोरी जेवल्याही नाहीत. कुणाशी काही बोलल्या नाहीत. आपले “आदरणीय’ शिक्षक आपल्याशी असं वागतील, असं वयाच्या नवव्या-दहाव्या वर्षी कुणाला वाटलं असेल? लैंगिक गैरवर्तन केल्यानंतर पोरींनी घरी काहीही सांगू नये यासाठी हे दोन शिक्षक त्यांना धमक्या देत होते.
अखेर एका मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितलं तर मैत्रिणीलाही तसाच अनुभव आलेला! एक मुलगी पालकांना घेऊन शाळेत गेली तेव्हा पोरीने अभ्यास केला नाही म्हणून आपण तिला रागावलो, असं दोघांपैकी एका निर्लज्ज शिक्षकाने सांगितलं. पालक मुलीलाच बोलले. पालकांचा आपल्या मुलींपेक्षा शिक्षकांवर अधिक विश्वास; कारण त्यांच्यासाठी शिक्षक म्हणजे देव! हे “देव’ आपल्याबरोबर काहीतरी घाणेरडं करतायत, एवढंच मुलींना कळत होतं. घरी तक्रार केली तर घरचे आपल्यालाच दोष देतात हेही त्यांनी पाहिलं होतं. पण अखेरीस त्या चार मुलींनी शाळेत जायलाच नकार दिला तेव्हा पालकांनी मुलींना कारण विचारलं.
सगळे एकाच वस्तीत राहत असल्यामुळे पालकांनी एकमेकांशी बोलून खातरजमा करून घेतली आणि त्यांचा संताप अनावर झाला. तथापि, आपण मोलमजुरी करणारे गरीब लोक असल्यामुळे कायदा हातात घेतला तर आपणच अडकू, असा विचार करण्याचा शहाणपणा एका पालकाने दाखवला. पोलिसात काम करणाऱ्या ओळखीच्या व्यक्तीला सांगितलं आणि पोलिसांनी दोन्ही शिक्षकांना शाळेच्या वाटेवरच पकडलं. त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळेलच; पण शाळेला विद्यामंदिर मानणाऱ्या पालकांच्या विश्वासाला गेलेला तडा कसा भरून निघणार?
हिमांशू