पुणे -कर्करोगावर आयुर्वेदात उपचार असल्याबद्दलही अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स (वैद्य) सांगतात. अर्थात ऍलोपॅथी आणि आयुर्वेदिक यांच्यातून विस्तव जरी जात नसले तरी दोन्हीकडे श्रद्धा ठेवूनच उपचार घ्यावे लागतात ही “बेसलाइन’ आहे. अशावेळी पुणे विद्यापीठात एका “पीएच.डी.’च्या संशोधक विद्यार्थ्याने काही वनस्पती कर्करोगाचे दुष्परिणाम रोखतात, असे संशोधन करून निष्कर्षही मांडले आहेत. उंदरावर केलेल्या संशोधनाने ते सिद्ध झाल्याचे या निष्कर्षात म्हटले आहे.
अश्वगंधा आणि शतावरी या सारख्या आयुर्ऱ्वेदिक औषधांच्या सेवनाने कर्करोगाच्या केमोथेरपी उपचाराचे दुष्परिणाम रोखता येतात, हे उंदरांवर केलेल्या संशोधनाने अलीकडेच सिद्ध झाले आहे. सदर संशोधन पुणे विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागातील प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. कल्पना जोशी आणि वैद्य गिरीश टिल्लू यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. आकाश सग्गम यांनी पीएच. डी. अभ्यासांतर्गत केले. हे संशोधन “सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ येथे डॉ. सुनील गैरोला आणि डॉ. मनीष गौतम यांच्या देखरेखीखाली पूर्ण झाले.
या प्रयोगाचे उद्दिष्ट कर्करोगाच्या उपचारातील मुख्य दुष्परिणाम “मायलो-सप्रेशन’ यावर केंद्रित होते. हाडांच्या गाभ्यातून पांढऱ्या पेशी निर्माण होण्याची क्षमता लोप पावण्याच्या प्रक्रियेला “मायलो-सप्रेशन’ असे म्हणतात. या पांढऱ्या पेशी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीचा अविभाज्य घटक असतात. उलटपक्षी, आयुर्वेदातील “रसायन’ संकल्पना शरीराची रोगप्रतिकारशक्ती इष्टतम राखण्यास मदत करते. या संकल्पनेला दुजोरा देणाऱ्या अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पती मानवी शरीरात उत्तम रोगप्रतिकार करतात, हे विविध संशोधनातून सिद्ध झालेले आहे. डॉ. आकाश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या वनस्पतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा उपयोग उंदराच्या मायलो-सप्रेशनला रोखण्यासाठी केला.
कर्करोगाच्या उपचारात नेहमी वापरल्या जाणाऱ्या “पॅक्लिटॅक्सेल’ नामक औषधाने उंदरामधील “मायलो-सप्रेशन’ उत्पन्न केले गेले. त्यानंतर अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पतींच्या अर्क सेवनाने हे “मायलो-सप्रेशन’ यशस्वीपणे रोखले गेले. ‘पॅक्लिटॅक्सेल’ औषधामुळे प्राण्यांमध्ये दिसून आलेले इतर दुष्परिणाम उदा. थकवा, सांधेदुखी, आणि केसगळती यांनाही अश्वगंधा आणि शतावरीच्या अर्क-सेवनाने रोखता आल्याचे या संशोधनातून दिसून आले. या प्रकल्पास आयुष मंत्रालयाचे अर्थसहाय्य मिळाले. या संशोधनाचे निष्कर्ष “फ्रंटीयर्स इन फार्माकॉलॉजी’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
कर्करोगाच्या उपचाराचे दुष्परिणाम रोखण्याच्या आयुर्वेदाच्या क्षमतेला अधोरेखित केले. या संशोधनाने आयुर्वेदातील रसायन संकल्पनान्वये राखल्या जाणाऱ्या प्रतीकारक्षमतेच्या समतोलास वैज्ञानिक पुष्टी दिली. या संशोधनाचा पुढील टप्पा प्रत्यक्ष कर्करोगाच्या रुग्णांवर रसायन संकल्पनेचा स्वास्थ्यकारक उपयोग असू शकेल.
– डॉ. आकाश सग्गम, पीएच.डी. संशोधक विद्यार्थी