हिमांशू
क्रिकेट हा काही आपला राष्ट्रीय खेळ नाही. पण या खेळात आपल्या देशाइतकी आर्थिक उलाढाल जगात कुठेच होत नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ही एक अत्यंत सधन संस्था मानली जाते. अर्थातच क्रिकेटविषयी पराकोटीचं प्रेम हेच या आर्थिक उलाढालीचं कारण आहे. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या मोसमात तर या प्रेमाला ऊत येतो. अनेकांना कल्पनाही नसेल की, जगात नव्हे तर आपल्या देशात इतरत्र कुठे काय चाललंय याबद्दल अजिबात माहिती नसलेल्या काही लोकांना आयपीएलचा संपूर्ण गुणतक्ता पाठ असतो. एवढंच नव्हे तर कोणता संघ स्पर्धेतून कधी बाहेर पडला? कुठला कधी बाहेर पडणार?
आतापर्यंतचे विजेते संघ कुठले? यंदा विजयाची खात्री कुठल्या संघाला सर्वांत जास्त आहे? आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सगळ्यात जास्त सिक्सर कुणी मारल्या? सगळ्यात जास्त विकेट कुणी घेतल्या? यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर चुकणं शक्य नाही, असे असंख्य लोक आहेत. आयपीएलसाठी संघांची निर्मिती, त्यासाठी खेळाडूंचा लिलाव, त्यातले सगळ्यात महागडे खेळाडू, स्पर्धेचे स्पॉन्सर्स हेही डिटेल्स अनेकांना तोंडपाठ असतात. क्रिकेटप्रेमींची एक वेगळीच दुनिया असते. कुणाची सभा आहे किंवा कोण “आत’ गेलं, या विषयांशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. निमशहरी आणि ग्रामीण भागात हॅलोजन लावून होणाऱ्या डे-नाइट क्रिकेट स्पर्धा ज्यांनी पाहिल्या, त्यांना तीर्थयात्रेचं पुण्य लाभलं..!
ग्रामीण आणि निमशहरी भागांतल्या काही स्पर्धांमधून मिळणारी बक्षिसं हादेखील चर्चेचा विषय ठरतो. आयपीएलच्या चषकापेक्षा मानाची ही बक्षिसं असतात. उदाहरणार्थ, सांगली जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातली क्रिकेट स्पर्धा जिंकणाऱ्या संघाला “मानाचा बोकड’ बक्षिस दिला जाणार आहे. दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या संघाला पाच देशी कोंबडे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पाच कोंबड्या बक्षिस मिळणार आहेत. यापूर्वीही अनेक ठिकाणी अशी बक्षिसं लावली आणि जिंकली गेलीयेत. सामान्यतः पहिल्या क्रमांकाच्या संघाला “बोकड’ मिळणार हे निश्चित असतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघाला कोंबडे मिळणार की कोंबड्या आणि त्यांची संख्या किती असणार,
एवढाच तपशिलातील फरक! काही ठिकाणी पहिल्या क्रमांकासाठी मेंढा, दुसऱ्यासाठी बोकड आणि तिसऱ्यासाठी कोंबडे दिले जातात. याखेरीज हॅट्ट्रीक करणारा गोलंदाज किंवा सलग तीन चौकार मारणारा फलंदाज यांना वीस अंड्यांचं बक्षिस देणारे आयोजकही पाहायला मिळतात. मालिकावीर, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्यासाठीही अशीच बक्षिसं असतात. केवळ सांगली-कोल्हापूरच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातसुद्धा अशा स्पर्धा भरवल्या जातात. बाजारात बोकडाची किंमत साधारणतः दहा-पंधरा हजारांच्या वरच आहे. देशी कोंबडा 700 रुपयांच्या आत येत नाही. म्हणजेच या स्पर्धांमधून मोठी आर्थिक उलाढालही होते.
क्रिकेटप्रेमाबरोबरच आनंद साजरा करायला आपल्याकडे स्थानिक पातळीवर किती कल्पक पर्याय उपलब्ध आहेत, हे तर अशा स्पर्धांमधून दिसून येतंच; शिवाय क्रिकेटप्रेमींचं एक अनोखं विश्व आपल्याला दिसतं. महानगरी क्रिकेटशौकिनांना आयपीएल स्पर्धेत आपल्या लाडक्या संघाची आगेकूच पाहून संतुष्ट राहावं लागतं; पण हे ग्रामीण खेळाडू प्रत्यक्ष मैदानात उतरून आपल्या क्रिकेटप्रेमाचा अक्षरशः उत्सव करतात. अशा स्पर्धांच्या फायनल मॅचनंतर होणारा जल्लोष पाहून बक्षिसाचे बोकड आणि कोंबडेही म्हणत असतील… “कुर्बान!’