सुवासिनीने वाकून नमस्कार केल्यावर ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती भवः’ असा आशीर्वाद ज्येष्ठांकडून पूर्वी मिळत असे. या आठ अपत्यांपैकी एखादी तरी कन्या असावी, असं आशीर्वाद देणार्या कुणाला वाटलं नाही. पुढे ही इच्छा पूर्ण करणं तंत्रज्ञानामुळे शक्य झालं आणि मुली जन्माला येऊच नयेत याची ‘काळजी’ अनेकांनी घेतली. त्याचे दोन परिणाम झाले. एक म्हणजे, ‘पीसीपीएनडीटी’ कायद्याचा जन्म झाला आणि हौसेनं जन्माला घातलेल्या मुलांना लग्नासाठी मुली मिळणं अवघड झालं. एकाहून अधिक मुलगे असलेल्या आईबापांची स्थिती नाजूक झाली; पण वधुपिते वरपित्याच्या रुबाबात वावरू लागले, हा सुपरिणाम! आजच्या काळात कुणीही कुणाला ‘अष्टपुत्रा’ होण्याचा आशीर्वाद देत नाही.
त्याऐवजी ‘इष्टपुत्रा’ म्हणणं अधिक ङ्गलदायी ठरतं, कारण पुत्र ‘इष्ट’निपजणं म्हणजे लॉटरी लागणं! मुलगा-मुलगी भेद सोडा; पण आठ अपत्यं होण्याचा आशीर्वादही आपल्याकडे आता परवडत नाही. एकत्र कुटुंबपद्धती असताना कुणाची किती मुलंं, याचा हिशोब ठेवणंही अवघड होतं, तशी परिस्थिती राहिली नाही. कुटुंबं विभक्त झाली आणि लोकसंख्येच्या ओझ्यानं देशाची प्रगती रोखली गेली तेव्हा ‘दो या तीन’चा जमाना आला. आता तर ‘एकच पुरे’चा काळ आलाय. आता कुणाला आठ अपत्यं झाली तर त्या दाम्पत्याकडे ‘आठवं आश्चर्य’ म्हणूनच पाहिलं जाईल. पण सगळीकडेच भारतासारखी परिस्थिती नाही. लोकसंख्या कमी असलेल्या काही देशांमध्ये ‘अष्टपुत्रा’ हा खरोखर आशीर्वाद ठरतोय.
असाच एक देश म्हणजे रशिया. अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे ‘युद्धखोर’ म्हणून प्रसिद्धी पावलेत आणि घराघरातले लाखो तरुण युक्रेनबरोबरच्या युद्धात कामी आलेत. त्यामुळे त्यांनी देशातल्या महिलांना ‘अष्टापत्यां’चा आशीर्वाद नुकताच दिलाय. मुलं की मुली हे स्पेसिङ्गाय करण्याची पद्धत रशियात नसली तरी पुतीन यांनी आठ हाच नेमका आकडा कसा शोधला, हे कोडंच आहे. आपल्याकडे अष्टपुत्रा लक्ष्मीची उपासना केली जाते, त्यावरून तसा आशीर्वाद रूढ झाला असावा, असं मानता येतं. शिवाय, अष्टादिक बंधन नावाचा विधीही आपल्याकडे असतो. आठ दिशा सुरक्षित आणि पवित्र करण्याशी त्याचा संबंध येतो.
पुतीन यांना आठ दिशा सुरक्षित करायच्या असतील आणि त्यासाठी घराघरात आठ अपत्यं असावीत असं त्यांना वाटत असेल, तर युक्रेन युद्धातून ते काहीच शिकले नाहीत असं दुर्दैवानं म्हणावं लागेल. जगाच्या क्षेत्रङ्गळाचा एक नवमांश म्हणजे, 1 कोटी 70 लाख 74 हजार 400 चौरस किलोमीटर (भारताचं 32 लाख 87 हजार 263 चौरस किलोमीटर) भाग व्यापणार्या रशियाची लोकसंख्या अवघी 14 कोटी 44 लाख (भारताची 1 अब्ज 42 कोटींपेक्षा जास्त) इतकीच आहे.
भारतात एक चौरस किलोमीटर जमीन 382 व्यक्तींमध्ये विभागलेली आहे तर रशियात एका चौरस किलोमीटरमध्ये 8.46 व्यक्ती राहतात. ही प्रचंड पोकळी भरून काढण्यासाठी पुतीन यांनी ‘अष्टापत्या’चं आवाहन महिलांना केलं असलं, तरी आजच्या काळात घरात आठ अपत्यं आहेत, हे कुणाच्या स्वप्नातसुद्धा येत नाही. दोन किंवा ङ्गारतर तीन मुलांचं संगोपन आईवडिलांना व्यवस्थित करता येईल. इतकी मुलं कोण सांभाळणार, याचं उत्तर पुतीन यांच्याकडे नसल्यामुळे युद्धखोरी थांबवून ‘इष्टपुत्र’ बनण्याचा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे.