हिमांशू
गुन्हेगाराचं जगणं म्हणजे अळवावरचं पाणी असतं, असं नव्यानं उदयाला आलेल्या एका टोळीप्रमुखाला समजावून सांगणारा पोलीस अधिकारी आपल्याला “मुळशी पॅटर्न’ चित्रपटात दिसतो. “या जगात फक्त प्लॅस्टिक टिकतं,’ हे वास्तव अधिकारी त्याला सांगायचा प्रयत्न करतो. परंतु बड्या भाईचा खातमा केल्याच्या उन्मादात नवा टोळीप्रमुख “मग मी प्लॅस्टिक आहे असं समजा,’ असं उत्तर अधिकाऱ्याला देतो. जणूकाही अमरपट्टा घेऊन आल्याची ही भावना केवळ त्या टोळीप्रमुखातच नव्हे, तर तुमच्या-आमच्यातसुद्धा आहे आणि खरोखर अमरपट्टा घेऊन जन्माला आलंय केवळ प्लॅस्टिक!
आपण त्याला तोंड लावून मिनरल वॉटर घटाघटा पितोय खरं; पण आपलं काही खरं नाही! कारण प्लॅस्टिक आपल्या आयुष्यात विरघळलं होतंच; पण त्याचा दुसरा टप्पा आता सुरू झालाय आणि या टप्प्यात ते आपल्या शरीरात विरघळायला लागलंय. माणसाच्या रक्तात प्लॅस्टिकचे सूक्ष्म कण सापडणं ही धोक्याची घंटा आहे; परंतु अशा बक्कळ घंटा आपण ऐकून न ऐकल्यासारख्या केल्यात. कारण आपल्याला प्रगतीचा कैफ चढलाय. पूर्वी “बारा गावचं पाणी’ पिणारा धूर्त, चतुर समजला जाई; पण आता तशी गरजच आपल्याला राहिली नाही. बारा गावं फिरताना मिनरल वॉटरची बाटली जवळ ठेवतो तो चतुर! पण हीच “चतुराई’ मायक्रोप्लॅस्टिकच्या रूपानं आपल्या धमन्यांमधून वाहू लागलीय. तरीही आपण आपल्या जीवनातला प्लॅस्टिकचा हस्तक्षेप वाढवतच चाललोय.
गंभीरपणे सांगितलेली कुठलीही गोष्ट गांभीर्यानं घेऊच द्यायची नाही, यालाच तर “आर्थिक ताकद’ म्हणतात. “काय होईल ते होऊ दे… जगाचं होईल ते आपलं होईल’ हा उन्मादच प्लॅस्टिकच्या रूपानं आपल्या शरीरात घुसला. यापूर्वी 2017 मध्ये मानवी पोटात प्लॅस्टिकचे कण सापडले होते. जगप्रसिद्ध दैनिकात तो वृत्तांत छापून आला तरी जगानं दुर्लक्ष केलं. आता “पॉलिथिलिन टेरेफ्थालेट’चे कण आपल्या रक्तात मिसळलेत. तथाकथित प्रगतीचे गोडवे गाताना आपल्या एका हातात कोल्ड्रिंकची बाटली आणि एका हातात चिप्सचं पॅकेट आहे; पण या दोन्हीतलं प्लॅस्टिक आपली “अधोगती’ सांगतंय.
खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये 36 टक्के प्लॅस्टिक (पॉलिस्टिरिन) आहे तर पॅकेजिंग फिल्म आणि प्लॅस्टिक बॅगमध्ये 23 टक्के पॉलिथिलिन आहे. हे पदार्थ नॉन-बायोडिग्रेडेबल म्हणजे विघटन न होणारे आहेत. हे पॅकेजिंग वाढल्यानंतरच आपल्याकडे कचरा डेपोच्या समस्या अधिक उग्र झाल्या, असं गेल्या काही वर्षांचा हिशोब केल्यास दिसून येईल. माणूस मृत्यू पावल्यानंतर तिसऱ्या दिवशी रक्षाविसर्जनानंतर सगळं संपून जातं; पण वेगवेगळ्या फॉर्ममधलं प्लॅस्टिक मात्र तीनशे ते एक हजार वर्षे टिकतं. इतके दिवस तर माणसाची आठवणही टिकत नाही. म्हणूनच प्लॅस्टिकच्या बाबतीत आता कठोर निर्णय घ्यावाच लागेल.
प्लॅस्टिकबंदी केली की त्याच्याशी संबंधित उद्योगांमधील किती कामगार बेरोजगार होतील वगैरे हिशोब मांडला जातो. परंतु आपल्या शरीराची अशी आतून “प्लॅस्टिक सर्जरी’ सुरू असेल, त्यामुळे वंध्यत्वासह असंख्य आरोग्यविषयक तक्रारी उद्भवत असतील, तर हिशोब कशाचा मांडायचा हे एकदा ठरवावंच लागेल. जाळलेलं प्लॅस्टिकसुद्धा नदीतून समुद्रात, तिथून माशांच्या पोटात आणि तिथून आपल्या पोटात येतंय. मग आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलोय, अशा थाटात “अमर प्लॅस्टिक’च्या नादी का लागायचं?