पुणे/मुंबई – आखाती देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड भागातील 82 कुटुंबाच्या घरातील महिला परदेशी गेल्या असून, त्यांच्याशी संपर्क राहिला नाही. दि. 1 जानेवारी ते 31 मार्चदरम्यान राज्यातील 3,594 महिला हरवल्या आहेत, अशी खळबळजनक माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील मुली आणि महिला मोठ्या प्रमाणावर बेपत्ता होत असून, यात 16 ते 35 वयोगटातील महिलांची संख्या लक्षणीय आहे. आखाती देशांमध्ये महिलांची तस्करी होत असल्याचे समोर आले आहे. महिलांच्या तपासासाठी महाराष्ट्र पोलीस, गृह विभाग करत असलेल्या कारवाईचा आढावा घेण्यासाठी राज्य महिला आयोग कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी सदस्या ऍड. गौरी छाब्रिया, सुप्रदा फातर्पेकर, महिला आणि बाल अपराध प्रतिबंध विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दीपक पांडे, कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महासंचालक सुहास वारके, पोलीस उपायुक्त डॉ. स्वामी, गृह सहसचिव राहुल कुलकर्णी, महिला आयोग उपसचिव दीपा ठाकूर, विधीज्ञ ऍड. वीरेंद्र नेवे उपस्थित होते.
राज्यातील मिसिंग सेल, अनेक जिल्ह्यांतील भरोसा सेल हे केवळ कागदावरच आहेत ही वस्तुस्थिती आहे, असा आरोपही चाकणकर यांनी केला.
राज्यातून महिला आणि मुली बेपत्ता होणे ही चिंतेची बाब आहे. आयोग 5 जानेवारी 2022 पासून विविध यंत्रणांना संपर्क करुन याबाबत पाठपुरावा करत आहे. महिलांना अमिष दाखवून परदेशी पाठवणाऱ्या मुंबईतील साकीनाका भागातील दोन एजंट विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, ही मोठी यंत्रणा असल्याने याविरोधात ठोस कारवाई करणे आवश्यक आहे. गृह विभागाने पोलिसांना सहभागी करून समिती स्थापन करावी. त्याचा दर 15 दिवसांनी अहवाल आयोगाला सादर करावा, अशा सूचना केल्याचे चाकणकर यांनी म्हटले आहे.
राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याची गेल्या काही महिन्यांतील आकडेवारी चिंताजनक असून या महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने समिती स्थापन करत शोध मोहीम राबवावी, आणि त्याचा अहवाल दर पंधरा दिवसांनी द्यावा.
– रुपाली चाकणकर,अध्यक्ष, राज्य महिला आयोग