कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. ममतांनी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी फेरनियुक्ती केली. ते तृणमूलमधील दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. त्यामुळे अभिषेक हेच ममतांचे राजकीय वारसदार असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले.
जुने-जाणते नेते विरूद्ध तरूण नेते असा संघर्ष तृणमूलमध्ये सुरू असल्याचे चित्र मागील काळात पुढे आले. अभिषेक यांचे निकटवर्तीय असणाऱ्या काही तरूण नेत्यांनी पक्षाने एक व्यक्ती, एक पद धोरण अवलंबण्याची मागणी लावून धरली. मात्र, ज्येष्ठ नेत्यांनी तसे धोरण अमान्य केले. त्यामुळे तृणमूलमधील धुसफूस चव्हाट्यावर आली. पक्षांतर्गत कलह संपवण्यासाठी ममतांनी मागील आठवड्यात राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची समिती बरखास्त केली.
आता नव्या नियुक्त्या करून ममतांनी नव्या-जुन्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. यशवंत सिन्हा, सुब्रता बक्षी, चंद्रिमा भट्टाचार्य या ज्येष्ठ नेत्यांनाही पुन्हा राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. बंगालमधील काही मंत्र्यांचाही पदाधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. त्यामुळे एक व्यक्ती, एक पद हे धोरण स्वीकारणार नसल्याचा स्पष्ट संदेशही ममतांनी पदाधिकाऱ्यांच्या निवडीतून दिला आहे.