औरंगाबाद – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून तीव्र निषेध करण्यात आला. त्यांच्याविरोधात राज्यभर निदर्शने काढण्यात आली. त्यांच्या घरावर दगडफेकही करण्यात आली. विरोधी पक्षासह सत्ताधाऱ्यांनीही सत्तार यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान या प्रकरणानंतर आज सत्तार पहिल्यांदा दौऱ्यावर गेले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले आहे. सत्तार यांच्या अशा प्रकारच्या स्वागतानंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अब्दुल सत्तार यांनी आज औरंगाबादचा दौरा केला. यावेळी सत्तार हे औरंगाबादच्या विश्रामगृहात आले असता कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करून त्यांचे स्वागत केले. गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सत्तार यांच्या अंगावर टाकण्यात आल्या. एखादा विजय मिळवल्यासारखा सत्तारांचे करण्यात आलेल्या या स्वागतामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीच्यावेळी सत्तार यांनी लम्पी रोगाबाबत पत्रकारांशी संवाद साधला, सत्तार म्हणाले, मुळात लम्पी हा आजार वाढण्याचे कारण म्हणजे औरंगाबाद जिल्हा जळगावला जोडून आहे. तर राजस्थान आणि मध्यप्रदेशमधून जळगावात लम्पी मोठ्याप्रमाणावर आला. त्यामुळे दोन्ही जिल्हे आजूबाजूला असल्याने लम्पीचा प्रादुर्भाव औरंगाबाद जिल्ह्यात वाढला. आता या आजारावर अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त लम्पी प्रतिबंधक लसीकरण करून हा आजार आटोक्यात आणल्याचे सत्तार यांनी सांगितले.
अतिवृ्ष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलेल्या नुकसानभरपाईबाबत माहिती देताना सत्तार म्हणाले की, आमच्या सरकारने एकाच हंगामात तीन वेळा शेतकऱ्यांना मदत दिली आहे. इतिहासात असे कधीच घडले नाही. जुलै आणि ऑगस्टमध्ये पीकांना पावसाचा मोठ फटका बसला. त्यानंतर परतीच्या पावसाने देखील मोठे नुकसान झाले. तीनही नुकसान एकाचवेळी देण्याची ही पहिली वेळ असल्याचे सत्तार म्हणाले. ऑगस्टमधील नुकसानभरपाईची मदत सप्टेंबरमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून त्यांची दिवाळी गोड केली.
मी सुरक्षित –
सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर सत्तार यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी देखील मागितली. मात्र विरोधकांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता राजीनाम्याच्या मुद्यावरून खुद्द सत्तार यांनीच सूचक विधान केले. मी ‘सुरक्षीत’ असल्याचे सूचक वक्तव्य सत्तार यांनी केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घेण्याचे टाळले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.