नवी दिल्ली – संसदेचे अधिवेशन आजपासून सुरू झाले. अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याबाबत रणनिती ठरविण्यासाठी कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीचे आज आयोजन केले होते. या बैठकीचे सगळ्यांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल कॉंग्रेस पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही त्यात सहभागी झाले.
आतापर्यंत कॉंग्रेसने बोलावलेल्या अशा बैठकांपासून हे दोन्ही पक्ष लांबच राहीले आहेत. त्यामुळे त्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विरोधकांची एकजूट करण्यासाठी बरेच प्रयत्न केले जात आहेत. त्यात कॉंग्रेसनेही पुढाकार घेतला होता. मात्र कॉंग्रेसच्या या पुढाकाराला आतापर्यंत तृणमूल आणि आपने वाटाण्याच्या अक्षताच दाखवल्या. त्यामुळे आता त्या पक्षाच्या नेत्यांची उपस्थिती पुन्हा एकीच्या नाऱ्याच्या शिडात हवा भरणारी ठरणार आहे.
Lok Sabha election 2024 : कॉंग्रेसशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – के. सी. त्यागी
मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते होते. त्यावेळीही त्यांनी विरोधकांची रणनिती ठरवण्यासाठी बैठक बोलावली होती. तेव्हाही याच दोन पक्षांनी त्यांना हात दाखवला होता. आता त्याच खर्गेंच्या बैठकीला त्यांची उपस्थिती ही भारत जोडोला मिळालेला प्रतिसाद, मोदी सरकारविरूध्द वाढत चाललेली नाराजी आदी विषयांशी जोडली जाते आहे.