लाखणगाव -आंबेगाव तालुक्याच्या विविध गावांत बुधवारी (दि. 13) रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेली व काढून ठेवलेली बाजरी, काढून ठेवलेला कांदा अशा पिकांचे नुकसान झाले आहे, तसेच आरणीत भरलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली होती.
वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काठापूर, देवगाव, लाखणगाव, पोंदेवाडी, पारगाव, निरगुडसर, जवळे, भराडी, शिंगवे आदी गावांतील पिकांना फटका बसला आहे. मागील 15 दिवसांपासून तीव्र उन्हाळा जाणवू लागला आहे. तापमानाने चाळिशी ओलांडल्याने उष्णतेत वाढ झाली आहे.
मात्र, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जोरदार स्वरूपाच्या वळवाच्या पावसाने परिसरात गारवा निर्माण झाला आहे.पावसामुळे नांगरून ठेवलेल्या जमिनीची ढेकळे फुटली असून, पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला वेग येणार आहे. मात्र, बाजरी काढलेल्या शेतकऱ्यांनीही बाजरीची कणसे झाकली आहेत. मात्र वैरण भिजली आहे