पुणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारला आहे. केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या दुकानांना यातुन सुट देण्यात आली आहे. अन्नधान्य, डाळी, कडधान्य आणि आवश्यक किराणा लोकांना उपलब्ध व्हावे, हा या मागचा हेतू आहे. मात्र, या जीवनावश्यक वस्तुंऐवजी जीभेचे चोचले पुरविणाऱ्या चैन्नीच्या वस्तुंनाच नागरिकांकडून जास्त मागणी आहे.
मॅगी, मसालेदार पदार्थ, चीज, बटर पास्ता, वेफर्स, फरसाणा, पाणीपुरीची पुरी, बिस्किटे, बेकींग पावडर, चॉकलेट पावडर, टोमॅटो सॉस, सुप तयार करण्याच्या पुड्या, नुडल्स पाकीटे, पावभाजी, सांभार, बिर्याणी मसाले, मुरमुरे, इन्सेस, सरबताच्या बाटल्या, ड्रायफ्रुट, कोल्ड्रींक्स, जाम, चॉकलेट यासारख्या वस्तुंना मागणी आहे. लोकांना अन्न, भाजी, दुध आणि औषधे मिळावीत, यासाठी याबाबतच्या वस्तुंच्या दुकांने चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
अन्नधान्य, कडधान्य, डाळी या वस्तुंची नागरिकांना खरेदी करावी, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यांच्याकडून जीभेचे चोचले पुरविणाऱ्या वस्तुंचीच अधिक मागणी आहे. नागरिकांना अनेक ठिकाणी घरपोच सेवा दिली जात आहे. एकदम महिना, पंधरा दिवसाचा किराणा नागरिकांनी भरणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिक एक, एक वस्तु घेण्यासाठी दुकानात येत असून, विनाकारण गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लाखो लोकांना बाधा झालेल्या करोनाचे नागरिकांना गांभीर्यच नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
याविषयी पुणे रिटेल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे म्हणाले, नागरिकांनी गरज असेल, त्यावेळीच खरेदीसाठी बाहेर पडावे. अन्यथा घरपोच सामान पोहोचविण्याची व्यवस्था सुरू आहे. चैन्नीच्या वस्तुंच्या ऐवजी जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तुंचीच खरेदी करावी. किरकोळ दुकानदारांनीही जीभेचे चोचरे पुरविणाऱ्या वस्तुंची विक्री करू नये.