वरळीत शिवसेनेची पोष्टरबाजी भाजपावर दबावाची रणनीती; दिवाळीनंतर सत्तास्थापनेला वेग
मुंबई : विधानसभा निवडणूकीत अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळालेल्या शिवसेनेने सत्तेत 50-50 फॉर्म्युल्याचा आग्रह धरला आहे. त्याचाच एक भाग म्हणून वरळीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख असलेली होर्डिंग्ज जागोजागी लागली आहेत. होर्डिग्जच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपावर दबावाची रणनिती आखली असल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे.
निकालांनंतर आता सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. निकालाच्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भाजपाच्या प्रत्येक अडचणी समजून घेऊ शकत नाही, असे स्पष्ट करतानाच लोकसभेदरम्यान ठरलेल्या 50-50 फॉर्म्युल्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी भाजपाची आहे, अशी आक्रमक भूमिका घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचे शिवसेनेसोबत ठरलेय,त्यानुसारच पुढच्या सर्व गोष्टी होतील इतकेच स्पष्ट केले आहे.
ठाकरे घराण्यात आदित्य यांच्यारूपाने विधानसभेची निवडणूक जिंकणारे पहिली व्यक्ती ठरली आहे. त्यांच्या विजयानंतर त्यांना शुभेच्छा देणारी भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असणारी होर्डिंग्ज वरळी विधानसभा मतदासंघात लागलेली आहेत. ही र्होडिंग्ज चर्चेचा विषय ठरली आहेत. दरम्यान, शुक्रवारी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
दिवाळीनंतरच सत्तास्थापनेच्या चर्चा
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दूरध्वनी करून उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले. भाजपाला 50-50 फॉर्म्युल्याची आठवण करून देताना उद्धव ठाकरे यांनी अमित शहा मुंबईत येउन चर्चा करतील असे म्हटले होते. त्यानुसार आता दिवाळीनंतरच दोन्ही पक्षांच्या एकत्रित चर्चांना सुरूवात होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.