मांडवगण फराटा (प्रमोल कुसेकर) : शिरूर (जि.पुणे) तालुक्यातील नागरगाव येथील उच्चशिक्षित युवा अभियंता समीर कांतीलाल शेलार यांनी देशाच्या कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे.
शेलार यांनी ऊसाचा रस डबाबंद व दीर्घ काळ टिकवून ठेवण्याचे संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनास भारतातील पाहिले पेटेंट मिळाले आहे. “A Composition and process for Preparation of storage stable sugarcane juice” हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता.
समीर शेलार यांनी हडपसर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजी महाविद्यालयातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे.त्यांच्या ह्या विशेष कामगिरीमुळे शेतकऱ्यांना ऊसाचा रस डबाबंद करून वर्षभर बाजारपेठेत विकता येईल.
‘प्रभात’शी बोलताना समीर शेलार म्हणाले की, इंजिनिअरिंग करत असताना नेहमी वाटायचे की,आपल्या भागातील शेतकऱ्यांसाठी काही तरी करावे,असा विचार करत असताना जाणवले की, देशात व राज्यात उसाचे उत्पादन कमी – जास्त प्रमाणात घेतले जाते. त्यातच निसर्गाचा लहरीपणा शेतीसाठी अडचण ठरत आहे. त्यामुळे ज्यावेळी उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते तेव्हा उसाचा बाजारभाव काही प्रमाणात पडलेला असतो.
अशा वेळी ऊस हे प्रमुख पीक असलेल्या शेतकऱ्यांसाठी दोन पैसे जास्तीचे मिळावेत व शेतकऱ्यांना फायदा व्हावा ह्या भावनेतून उसावर प्रक्रिया करून त्यापासून ज्युस निर्मिती हा विषय निवडला होता. असे समिर शेलार यांनी सांगितले. त्यामुळे उसाचा रस डबाबंद करून जास्त कालावधीसाठी साठवण्याच्या प्रयोगाला यश आले आहे. त्याचा फायदा देशातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणारा आहे. असे समिर शेलार यांनी सांगितले.