पुणे – साडेतीन मुहूर्तांपैकी खरेदीसाठी महत्त्वाचा मुहूर्त असणाऱ्या अक्षय तृतीयेवर यंदा करोनाचे भीषण सावट आहे. लॉकडाऊन काळात वाहन खरेदीबरोबरच गुढीपाडवा आणि अक्षयतृतीयेच्या निमित्ताने होणाऱ्या सोने-चांदीच्या खरेदीला फटका बसला आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी मागील महिनाभरापासून लॉकडाऊन जाहीर केले आहेत. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व व्यवहारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. याला सराफ व्यवसाय देखील अपवाद नाही. बहुतांश जण साडेतीन मुहूर्तांचे औचित्य साधून घर, वाहन, गृहोपयोगी वस्तू, सोने-चांदीच्या वस्तू, दागिने, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदींची खरेदी करतात. त्याच्या खरेदी आणि बुकिंगसाठी आठवडाभर आधीच बाजारपेठांत ग्राहकांची गर्दी होते. मात्र, यंदा लॉकडाउनमुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे.
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून नागरिक विशेषत: सोन्याची खरेदी करतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी केलेली गोष्ट अक्षय राहते, असे अनेक जण मानतात. त्यामुळे किमान वेढणीची खरेदी करावी, असा ग्राहकांचा कल असतो. यंदाच्या गुढीपाडव्यानंतर सराफ व्यावसायिकांची अक्षय तृतीयेवर भिस्त होती. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये वाढ केल्याने, अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील हुकला आहे. दरवर्षी साधारण मार्चपासून लग्न सराईच्या निमित्ताने दागिन्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी असते. यावर्षीचे लग्न समारंभांना देखील स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा सराफ व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
गुढीपाडव्यानंतर आता अक्षयतृतीयेला देखील सराफ बाजार बंद आहे. ग्राहकांना अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधता यावा, यासाठी आम्ही ऑनलाइनचा बुकिंगचा पर्याय सुरू केला आहे. मागील दोन दिवसांपासून याचे बुकिंग सुरू असून, ग्राहकांना दुकाने सुरू झाल्यानंतर त्यांची ऑर्डर देण्यात येणार आहे. सराफ बाजाराबरोबरच सर्वच व्यावसायिकांना आर्थिक फटका बसला आहे. हा लॉकडाउनचा कालावधी लवकरात लवकर पूर्ण व्हावा आणि व्यवहार सुरळीत व्हावेत, अशी प्रार्थना आम्ही करत आहोत.
– फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स