वडूज -कातरखटाव (ता. खटाव) येथे बुधवारी सकाळी 9 वाजता सांगलीहुन गाझियाबाद येथे बेदाणे घेवून निघालेला ट्रक पलटी झाला. या अपघात एक जण गंभीर तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, मिरज-भिगवण हा राज्य मार्ग कातरखटाव गावातून जातो. या मार्गाचे मनमाड-बेळगाव या राष्ट्रीय महामार्गामध्ये रुपांतर झाले आहे. या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक सुरु असते. गेल्या दोन महिन्यापुर्वीच रस्त्याचे नूतनीकरण झाले आहे. मात्र ठेकेदाराने रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्या भरलेल्या नाहीत. याबाबत वर्तमानपत्रातून आवजही उठविला होता.
मात्र याकडे ठेकेदारासह प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळी 9 वाजता बेदाण्याने भरलेला ट्रक सांगलीहुन गाझीयाबादकडे निघाला होता. हा ट्रक विजयराज हॉटेलच्या समोर आला असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकला साईड देत असताना चाके रस्त्यावरुन खाली उतरली. रस्त्याची साईडपटटी खोल असल्याने चालकाचा ताबा सुटला.
दुध घालण्यासाठी निघालेल्या कातरखटावच्या सतिश जंगम (वय 47) या युवकास ताबा सुटलेल्या ट्रकने धडक दिली व पुढे शंभर मीटरवर जावून हा ट्रक पलटी झाला. मोठा आवाज झाल्याने आजुबाजूचे लोक गोळा झाले व ट्रकमध्ये असणाऱ्या दोघांना बाहेर काढले.
यामध्ये ट्रकचा क्लिनर ब्रिजेश पाल (वय 27) हा किरकोळ जखमी झाला. तर सतीश जंगम यांच्या डोक्यास जोरात धडक बसल्याने तो गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला आहे. या अपघातात ट्रकचे मोठे नुकसान झाले असून ट्रकमधील बेदाण्याची बॉक्स अस्ताव्यस्त पडलेली आहेत. लोक मात्र बेदाणे पळपिण्याचा प्रयत्न करीत आहेत.