सातारा – सातारा पालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर सुमारे वर्षभरापूर्वी अजिंक्यतारा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांचे काम जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झाले होते आणि खांबसुद्धा उभे झाले होते. फक्त वीज कनेक्शन नसल्याने पथदिवे सुरू नव्हते. या पथदिव्यांसाठी कनेक्शन घेऊन प्रकाश’ पाडण्यास सत्ताधाऱ्यांना वर्ष लागले.
यासाठी सत्ताधाऱ्यांचे कौतुक करावे की सातारकारांचे दुर्दैव म्हणावे, असा खोचक सवाल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे. पालिकेची निवडणूक जवळ आल्याने नेत्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊस पडणारच, असा टोलाही त्यांनी लगावला.
याबाबतच्या प्रसिद्धीपत्रकात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी म्हटले आहे की, गेल्या साडेचार वर्षांत सातारा पालिकेत टक्केवारी आणि टेंडरसाठी सत्ताधारी नगरसेवकांमध्ये अनेकदा कळवंडी लागल्या. एकमेकांचे गळे धरले गेले. त्याकडे नेत्यांनी सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले. आता निवडणूक जवळ आल्याचे लक्षात येताच, नुसत्या घोषणांचा पाऊस पाडण्यात येत आहे. यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही.
सातारकरांशी काहीही देणेघेणे नसणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी राजकीय स्वार्थासाठी खोटं बोल पण रेटून बोल’ हा पायंडा सुरू ठेवला आहे. हद्दवाढीनंतर वर्षभरापूर्वी अजिंक्यतारा किल्ला रस्त्यावरील पथदिव्यांना जिल्हा नियोजनमधून मंजुरी मिळाली होती; परंतु सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा आणि खाबुगिरीमुळे कनेक्शन घ्यायला वेळ मिळाला नाही.
आता पालिकेची निवडणूक आल्याने नेत्यांच्या डोक्यात प्रकाश’ पडला आहे. वर्षांनंतर का होईना पथदिव्यांचे कनेक्शन घेऊन त्यांचा उजेड पाडला गेला, हे न कळण्याइतपत सातारकर दुधखुळे नाहीत. आता परतीच्या पावसाला सुरवात होणार आहे.
त्याच पद्धतीने निवडणूक आली की, सत्ताधाऱ्यांकडून विकासकामांच्या घोषणांचा पाऊसही सुरू होणार, हे सातारकरांना पाठ झाले आहे. न केलेल्या आणि न होणाऱ्या विकासकामांच्या घोषणा होऊन नारळ फुटणार, याची तयारी सातारकरांनी केली आहे. गेल्या साडेचार वर्षात पालिका भ्रष्टाचाराने धुवून निघाली. आता दोन-चार महिन्यात आणखी किती प्रकाश’ पडतोय, हे बघावे लागेल.