मुंबई (दि. 28) : राज्यात 2021 या वर्षामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पूरस्थितीमुळे जुलैमध्ये झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता 365 कोटी 67 लाख व ऑगस्ट – सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानिकरिता 4 हजार 864 कोटी असे एकूण 5 हजार 221 कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पत्रकारपरिषदेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार म्हणाले, ऑगस्ट व सप्टेंबर 2021 मध्ये राज्यातील 23 जिल्हे अतिवृष्टी व महापुरामुळे बाधित झाले. या नैसर्गिक संकटामुळे 23 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिकट असताना सुद्धा शेतकऱ्यांना प्रत्येक संकटात शासनाने मदत केली आहे. अतिवृष्टी व महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे या कठीण परिस्थितीत शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. खचलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करून त्याला या संकटातून बाहेर काढता यावे व रब्बी हंगामासाठी त्याला आर्थिक आधार मिळावा या उद्देशाने बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असून ती मदत वितरित करण्याचे काम सुरु करण्यासाठी आदेश दिले असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगिले.
अतिवृष्टी व महापुरामुळे राज्यातील 23 जिल्ह्यातील एकूण 47 लाख 55 हजार 747 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून बाधित क्षेत्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण रू. 4846.66 कोटीची मदत शासनाने घोषित केलेली आहे. देय असलेल्या एकूण रक्कमेच्या 75% (3634.99 कोटी रुपये) मदतीचे वाटप सुरू झाले असून त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित झाला आहे. जुलै 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. 6 ऑक्टोबर 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये 365 कोटी 67 लाख रुपये, ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना दि. 26 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये 14 जिल्ह्याकरिता रू. 2 हजार 860 कोटी 84 लाख 7 हजार रुपये तर दि. 27 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या शासन निर्णयान्वये 9 जिल्ह्याकरीता रू. 774 कोटी 15 लाख 43 हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या खात्यावर मदत जमा करताना 26 ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे दिवाळीनंतरसुद्धा सुरु रहाणार आहे. 2014 ते 2019 दरम्यान शेतकऱ्यांना फक्त एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव ठेवून शासनाने शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त मदत देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला असल्याचे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले.