हिंगोली – आरळ ते चिखली मार्गावर परभणीहून वसमतकडे जाणाऱ्या भरधाव कारने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. 3 सकाळी 10.30 च्या सुमारास घडली आहे.
गयाबाई बालासाहेब भालेराव (61), शिवाजी बालासाहेब भालेराव (41, दोघे. रा. दारेफळ, ता. वसमत) अशी मयतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दारेफळ येथील गयाबाई भालेराव यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्या त्यांच्या मुलगा शिवाजी भालेराव याच्या सोबत आज सकाळी दुचाकी वाहनावर परभणीकडे निघाले होते.
सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे दुचाकी वाहन आरळ ते चिखली मार्गावर आले असतांना परभणीकडून वसमतकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने त्यांच्या दुचाकीला समोरासमोर धडक दिली.
या अपघातात गयाबाई व शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, जमादार गणेश सुर्यवंशी, शेख इक्बाल, मारोती गडगिळे, महेश अवचार यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले आहे. अपघातानंतर कार चालकाने वाहन घटनास्थळावर सोडून पळ काढला आहे.
दरम्यान, मयत शिवाजी भालेराव यांची जवळाबाजार येथे मोबाईल शॉपीचे दुकान आहे. या दुकानावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु होता. अपघाताच्या याघटनेमुळे दारेफळ गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांनी संगितले.