जेनेट संतोष माने या सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आल्या. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण घेतले. खडकीतील एस. व्ही. एस. शाळेतून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. तसेच पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी केमेस्ट्री विषयात पदवी मिळविली. कौटुंबिक गरजेपोटी त्यांनी खासगी नोकरी स्वीकारली. परंतु शिक्षणाविषयीची आवड त्यांच्या मनात कायम होती. त्या क्षेत्रात आपण काही तरी कार्य करावे, अशी मनीषा कायम होती. नोकरीनिमित्त प्रवास करताना प्रवासात काही ना काही चर्चा कानी येत. एक दिवस प्रवास करत असताना आजी-आजोबांचे संभाषण सुरू होते. आपण केवळ सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे न जगता जीवनात काही तरी इतिहास घडविला पाहिजे. हे वाक्य त्यांच्या अंतःकरणाला भिडले. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील आपली आवड जोपासली तर चांगले कार्य निर्माण होईल. त्यामुळे आपण लोकांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहू. ही खुणगाठ त्यांनी मनाशी बांधली. शिक्षणातील खारीचा वाटा उचलण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
पुढे जाऊन आपण करत असलेल्या कार्याला मोठे स्वरूप देण्यासाठी त्यांनी पुण्यातील कासारवाडी येथे 2005 साली इन्फंट जिस्स प्रा. स्कूलच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यात पर्दापण केले. या शाळेचे वैशिष्टय म्हणजे येथे जे अध्यापक आहेत ते सर्व महिला आहेत. त्यामुळे महिलांना बरोबर घेऊन शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदान करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. क्लासपासून झालेले शैक्षणिक कार्य आता माध्यमिक शाळेपर्यंत येऊन पोहचले आहे. त्यांनी लावलेले इवलेशा वृक्षाचा आज वटवृक्ष होत आहे. त्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे; परंतु आणखी पुढील वर्ग सुरू करण्याचा मानस आहे.
मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सुसज्ज अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सीसीटीव्ही, सायन्स लॅब, कॉम्प्युटर लॅब, ग्रंथालय, गेस्ट रूम, तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सांस्कृतिक, क्रीडा, विज्ञान प्रदर्शन असे उपक्रम घेतले जातात. शाळेतील मुलांना त्या स्वतःच्या मुलांसारखे घडविण्याचा, त्यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असतात. संपूर्ण कुटुंबाने शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेतले आहे. कुटुंबातील पती संतोष माने, आई-वडील, मुलगी पुनित माने या सतत शैक्षणिक कार्यासाठी मदत करत असतात.
हे शैक्षणिक संकुल उभारताना मला असंख्य अडचणी आल्या; परंतु मनात दृढ निश्चिय असल्याने कोणत्याही संकटाला न घाबरता मी खंबीरपणे उभा राहिले. त्यामुळे माजे स्वप्न साकार झाले. स्त्रियांनी केवळ घरात मुलांचा संभाळ करत बसू नये, तर मॉं जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून कुटुंबाबरोरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचादेखील विकास केला पाहिजे. आपण जन्माला आलो आहे, तर काही तरी वेगळे केले पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा ठसा या विश्वात निर्माण केला पाहिजे, असा संदेश त्या आजच्या महिलांना महिला दिनाच्या निमित्ताने देत आहेत.
शाळेचा गौरव
गोल्ड स्कूल ऍवॉर्ड
इंडियन टॅलेन्ट ऑलियामप्याडकडून शाळेतील मुलांना स्कॉलरशिप मिळत आहे.