प्रकल्पाचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण होण्याचे पुणे महानगर पालिकेचे आश्वासन
पुणे – भामा आसखेड प्रकल्प पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनाने आता नवी तारीख दिली असून, मार्च अखेरपर्यंत तो पूर्ण होईल, असे आश्वासन प्रकल्पप्रमुख प्रवीण गेडाम यांनी गुरुवारी मुख्यसभेत दिले.
भामा आसखेड प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासनाकडून तारीख पे तारीख दिली जात आहे. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हे काम मार्च 2020 मध्ये पूर्ण होईल, असे गेडाम यांनी सांगितले. शहराच्या पूर्व भागातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आखण्यात आलेली भामा आसखेड पाणीपुरवठा योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पुनर्वसनापोटी 25 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्याचा प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर केला.
यावेळी नगरसेवकांनी या प्रकल्पाची नेमकी स्थिती काय आहे, योजनेचे काम पूर्ण होण्यासंदर्भात प्रशासनाकडून प्रत्येकवेळी वेगवेगळी तारीख सांगितली जात आहे, हे काम नेमके कधी पूर्ण होणार असे विविध प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केले.
या प्रकल्पाचे काम सहा टप्प्यात केले जाणार आहे. धरणातील पाणीसाठी जॅकवेल आणि पंपहाऊस उभारला आहे. याठिकाणी वीजपुरवठा अद्याप जोडला गेला नाही. प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी जलवाहिनी टाकण्याचे काम रोखून धरले आहे. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे 25 कोटी रुपये पुनर्वसनासाठी वर्ग केले आहे. उर्वरित 25 कोटी रुपये हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर वर्ग केले जाणार असल्याचे गेडाम यांनी सभागृहात सांगितले.
जलवाहिनीचे काम अद्याप अपूर्ण
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील जलवाहिनी टाकण्याचे काम आता डी. वाय. पाटील संस्थेच्या जागेतून केले जाणार आहे. तीन किमी लांबीची जलवाहिनी टाकण्याचे काम अद्याप अपूर्ण आहे. दोन महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या कालावधीत पोलीस बंदोबस्त मिळू शकला नाही, त्यामुळे हे काम त्यावेळी पूर्ण होऊ शकले नव्हते. आता पोलीस बंदोबस्त मिळण्यात अडचण नाही. या प्रकल्पाची सर्व कामे मार्च महिन्यांपर्यंत पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित होईल, असा दावा गेडाम यांनी केला.