पुणे – टाळ-मृदुंगाचा गजर व हरिनामाचा जयघोष करीत लाखो वैष्णव देहभान विसरून पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. आज सोपानदेवांच्या सासवड नगरीचा निरोप घेवून जेजूरीकडे मार्गस्थ झालेल्या श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे जेजूरी नगरीत आगमन होताच जेजूरीवासियांनी बेल भंडार्याची मुक्तपणे उधळण करीत माऊलींसह लाखो वैष्णवांचे उत्साही व भक्तीमय वातावरणात स्वागत केले.
याच पालखी सोहळ्यात आपल्या महाविद्यालयीन काळातील मित्र व ज्येष्ठ नागरिक वारीच्या निमित्ताने एकत्र येत गेली पाच वर्षे वारीतील वारकऱ्यांना तसेच युवकांना व्यसनमुक्तीबरोबरच वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश देत आहेत.
व्यसनामुळं अनेक कुटुंब उध्दवस्त झाल्याची अनेक उदाहरणे आपण वर्तमानपत्रातून वाचतो. तसेच सध्याच्या पिढीतील अनेक तरूण हे व्यसनाच्या विळख्यात अडकले आहेत. हे लक्षात घेता हा उपक्रम हाती घेतल्याचे या उपक्रमातील सदस्यांनी यावेळी सांगितले. तसेच वारीतील वारकऱ्याकडून तंबाखू पुडी घेऊन त्याला व्यसनमुक्तीचे धडे देण्याबरोबरच वृक्षाचे बियाणे देत वृक्ष लागवड व संवर्धानाचा संदेशही देण्याचे काम यानिमित्त केले जात असल्याचे यावेळी सदस्याने सांगितले.
त्यांच्या माध्यमातून वारी, दिंडीत व्यसनमुक्तीचे प्रबोधन गेली अनेक वर्षे सुरु असून अनेक वारकरी व्यसनमुक्त झाले आहेत.