दिवे -ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळाले आहे. तर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे नगदी पीक व फळबागांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये “थोडी खुशी थोडी गम’ अशी परिस्थिती झाली आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे पाणलोट क्षेत्रातील छोटी-मोठी धरणे, पाझर तलाव, नदी, नाले, बंधारे, शेततळी तुडुंब भरली आहेत. तर विहिरी, बोअरवेलची पाणीपातळीही कमालीची वाढली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, पाऊस उसंत घेत नसल्याने शेतकऱ्यांना पिकांवर औषध फवारणी करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने फळबागांवर व नगदी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोगराईचा प्रादुर्भाव झाला आहे.
अंजीर व सीताफळांच्या बागांमध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचल्याने बागांची मुळे कुजून झाडे उन्मळून पडण्याची शक्यता आहे. तर अंजिरावर करपा व तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच सीताफळ काळे पडून फळगळती होत आहे. तर आले व इतर पिके पिवळी पडू लागली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
दुहेरी संकटात
करोनामुळे सीताफळ हंगाम धोक्यात आला असून सीताफळाचा तयार माल मिळेल त्या भावात विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकरी वर्गाला दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यातच सततच्या पावसाने शेतीतील कामे पूर्णपणे ठप्प झाली असल्याने पिकात तणांचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. त्यामुळे एरव्ही चातकासारखी पावसाची वाट पाहणारा बळीराजा आता पाऊस उघडण्याची प्रतीक्षा करीत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सीताफळावर बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे, त्यामुळे फळे काळी पडून फळगळती होत आहे त्यामुळे वेळेनुसार शेतकरी वर्गाने बुरशीनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे.
– नितीन जाधव, संचालक, हरेकृष्ण कृषी सेवा केंद्र