उमेश सुतार
कराड -सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात व्हॉटस् ऍप, ट्विटर, फेसबुक यासारख्या सोशल मीडियाचा कोण कोणत्या कारणाने वापर करेल, हे सांगता येत नाही. त्यामुळे हे युग सोशल मीडियाचे आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. विघातक दृष्टिकोनातून सोशल मीडियाचा वापर करून, आभासी दुनिया निर्माण करत दादागिरी करणाऱ्या भाईंना खाकीचा टोला बसू लागला आहे. सोशल मीडियावर “डांगडिंग’ करणाऱ्यांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे.
शाळा, कॉलेजमधील विद्यार्थी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यांच्यामध्ये आपली क्रेझ निर्माण व्हावी, यासाठी साधे मिसरुड न फुटलेले भाई सोशल मीडियाच्या माध्यमातून डॉनगिरी करताना दिसत आहेत. वेगवेगळ्या पोझमधील फोटो व व्हिडिओ तयार करुन ते सोशल मीडियावर अपलोड केले जात आहेत. सोशल मीडिया अकाऊंटवर शूटर, किलर, आग, किंग, एन्ट्री बॉय, राडा, डॉन यासारखी नावे देऊन तयार केलेल्या व्हिडिओज्नी धुमाकूळ घातला आहे.
आभासी दुनियेतील गॅंगकडून हे व्हिडिओ शाळा, महाविद्यालयीन तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांच्यात दहशत माजवली जात आहे. फोटोशेसनच्या व्हिडिओज्च्या लिंक व्हायरल झाल्याने त्याकडे शाळा, कॉलेजमधील युवक आकर्षित होत आहेत. सोशल मीडियावरील या घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांची यंत्रणा असली तरी सोशल मीडियावर बोकाळलेली गुंडगिरी संपुष्टात आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
कराडला अनेक वर्षांपासून गुंडगिरीचा इतिहास आहे. यामध्ये अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. आता सोशल मीडियाच्या जमान्यात युवकांमध्ये याचे पेव वाढल्याचे चित्र आहे. हे रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. शाळा, कॉलेजमध्ये प्रबोधन करण्याची गरज आहे. पोलिसांची सोशल मीडियावर करडी नजर आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या गैरवापरावर काही प्रमाणात अंकुश बसला असला तरी विविध नावांनी फेसबुक अकाउंट चालवणाऱ्यांचे कंबरडे मोडण्याची गरज आहे.
कारवाईत सातत्य गरजेचे
महाविद्यालय परिसरात हुल्लडबाज युवकांवर पोलिसांनी नुकतीच केलेली कारवाई स्वागतार्ह आहे; परंतु “नव्याचे नऊ दिवस’ अशी परिस्थिती न राहता, अशा कारवायांमध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे.
स्टाइल इज स्टाइल
बर्थडे रस्त्यांवर साजरा करण्याची क्रेझ सध्या आहे. साधे मिसरुडही न फुटलेले युवक रस्त्यांवर, बाईकवर, फुटपाथवर, चौकात केक कापून वाढदिवस करत आहेत. “स्टाइल इज स्टाइल’, असे म्हणत बर्थडे बॉयला केक भरवणे, तोंडाला फासणे, अंडी मारणे असे प्रकार केले जातात. त्याचा आसपासच्या नागरिकांना त्रास होतो, याचा विचार हे युवक करत नाहीत. सामाजिक शांतता भंग करणारे वाढदिवस बंद करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारावा.
पालकांनी लक्ष द्यावे
सोशल मीडियाच्या जमान्यात आपली मुले कोणते शिक्षण घेत आहेत, याकडे पालकांनी लक्ष द्यावे. काही दिवसांपूर्वी एका शाळेतील मुलांकडे कोयत्यासारखी प्राणघातक शस्त्रे सापडली होती. त्यामुळे मुलांना योग्य मार्गावर आणण्यासाठी त्यांचे प्रबोधन करण्याची गरज आहे.