पुणे – सुमारे पावणेतीन वर्षांपासून वेगळे राहणारे उच्चशिक्षित दाम्पत्य त्यांच्या चार वर्षीय चिमुकल्याच्या भवितव्याचा विचार करत पुन्हा एकत्र आले. त्यांनी नव्याने संसार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही परराज्यातील आहेत. तो आयटी क्षेत्रात कार्यरत, तर ती खासगी कंपनी नोकरी करते. त्याच्या वतीने कौटुंबिक न्यायालयात ऍड. खंडेराव टाचले, ऍड. सुवर्णा शिंदे, ऍड. मनिष मगर आणि ऍड. आकाश बिराजदार यांनी काम पाहिले. तिच्या वतीने ऍड. शितल वैद्य-दाबके यांनी काम पाहिले. या दाम्पत्याचा विवाह मे 2017 मध्ये झाला. वर्षभरातच दोघांना मुलगा झाला. तो तिच्याकडे असायचा. तिचे वडिल दोघांच्या संसारात ढवळाढवळ करत होते. त्यामुळे दोघांत वाद होत असत.
त्यावरून 1 फेब्रुवारी 2020 रोजी ती माहेरी निघून गेली आणि परत आलीच नाही. करोना काळात मे 2020 ई-मेलवरून घटस्फोटाची नोटीस तिने बजावली. त्याला त्याने जुलै 2020 मध्ये ई-मेलनेच उत्तर दिले. त्यानंतर दोघांच्या वकिलांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेण्यावरून एकमत झाले. दोघांनी ड्राफ्ट तयार करून एकामेकांना पाठवले. त्याने मुव्हर्स आणि पॅकर्सद्वारे लग्नात मिळालेले साहित्य परत करण्याची तयारीही दर्शवली. ती कल्याण येथे राहायची. अचानकच जून 2021 मध्ये पोलिसांच्या महिला तक्रार निवारण केंद्राची त्याला नोटीस आली.
त्यानुसार तो हजर झाला. त्याचा जबाबही नोंदविण्यात आला. मात्र, तिने अचानक नोटीस बजावल्याने त्याने क्रुरता आणि जोडीदार (कुटुंबीयांचा) अचानक विनाकारण परित्याग केल्याच्या कारणावरून येथे घटस्फोटासाठी 10 मार्च 2022 रोजी अर्ज दाखल केला होता. तिने कल्याण येथे पोटगीचा दावा दाखल केला. येथील दाव्यातही ती हजर झाली. दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यामध्ये मुलाच्या भवितव्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यानुसार दोघे एकत्र आले. एकमेकांविरोधातील दावे दोघांनी काढून टाकले. लोकअदालतमध्ये यावर शिक्कामोर्तब झाले.
“समुपदेशनामध्ये पती-पत्नी दोघांनाही मुलाच्या भवितव्याचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्यामुळे दोघांनी वाद विसरून पुन्हा नव्याने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलाचे होणारे नुकसान टळले आहे. दोघांचे भवितव्यही सुखकर असणार आहे.”
-ऍड. खंडेराव टाचले, माधवचे वकील