सातारा- खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील शेतकरी शांताराम भगवान बागल यांच्या मालकीचा दोन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना रविवार (दि.20) रोजी घडली. या घटनेनंतर परिसरातील तरूणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने आग विझवण्यात यश आले नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार, शांताराम बागल यांच्या शेतातून महावितरणचे पोल गेले असून त्यावरील तारांच्या घर्षणामुळे त्यातून बाहेर पडणार्या ठिणग्या बागल यांच्या शेतात पडल्या अन् त्यांच्या शेतातील ऊसाला आग लागली. ऊसाच्या फडातून धुराचे लोट दिसू लागल्याने परिसरातील तरूणांनी बागल यांच्या शेताकडे धाव घेतली. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने विझवण्यात अपयश आल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान घटनास्थळी कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही, मात्र शेतातील झालेले नुकसानामुळे शेतकऱ्याने टाहो फोडला.