कारवाई करूनही परिस्थिती “जैसे थे’ : वाहनांमध्ये ज्वलनशील घटक ठेवल्याने धोका
– प्रकाश गायकर
पिंपरी – शहरामध्ये रस्त्यांवर अनेक खाद्यपदार्थ विक्रेते दुकाने थाटतात. त्याबाबत तक्रारी वाढल्यानंतर महापालिका प्रशासनाने अशा दुकानदारांवर कारवाई सुरू केली. या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक दुकानदारांनी आता फूड टेम्पोची (मोबाइल कॅन्टीन) शक्कल लढवली आहे. हे वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून राजरोसपणे व्यवसाय केला जात आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे फूड टेम्पोचा शहरामध्ये सुळसुळाट झाला आहे. वाहनातून बेकायदा ज्वलनशील घटक बाळगून खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत.
शहरात दिवसेंदिवस फूड टेम्पोची संख्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे. याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय नेत्यांच्या वरदहस्तामुळे रस्त्यामध्ये कुठेही वाहने पार्क करून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील रेल्वे स्टेशन, आयटी कंपन्या व विविध चौकातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर महापालिका प्रशासन कारवाई करते. या कारवाईपासून वाचण्यासाठी विक्रेत्यांनी नवीन शक्कल लढविली आहे. वाहनामध्ये खाद्यपदार्थांची विक्री करता येईल, अशा पद्धतीने वाहनांची रचना केली जाते. तसेच या वाहनामध्येच पदार्थ तयार केले जातात. त्यासाठी वाहनांमध्ये गॅस सिलिंडर ठेवले जातात. तसेच अन्न शिजविण्यासाठी केरोसीनवर चालणाऱ्या उपकरणाचाही वापर केला जातो. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता आहे.
बेकायदा व्यवसाय करणाऱ्या या विक्रेत्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केल्यानंतर ते पुन्हा तिथेच व्यवसाय करतात. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभागही हतबल झाला आहे. शहरातील चापेकर चौक, पिंपरी कॅम्प, तळवडे आयटी पार्क या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहने रस्त्याच्या कडेला लावून व्यवसाय थाटला आहे. शहरातील रस्त्यावर अशा प्रकारे व्यवसाय थाटून भुकेल्यांची सोय होत असली तरी त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला ही सामोरे जावे लागत आहे. वर्दळीच्या ठिकाणी वाहने पार्क केल्यामुळे वाहतूककोंडीची सामना करावा लागतो. तर गॅस व इतर उपकरणे वापरल्यामुळे अपघात होऊन नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे अशा व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव
ग्राहकांना खाण्यासाठी देण्यात येणारे हे अन्नपदार्थ सुरक्षितरित्या झाकून ठेवण्यात येत नाहीत. अनेक ठिकाणी विक्री सुरु असलेल्या ठिकाणी आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरल्याचे दिसून येते. त्यातच शहराच्या अनेक भागामध्ये प्रशासनाने रस्त्याची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शहरामध्ये बहुतांश ठिकाणी धुळीचा लोट पहायला मिळतात. उघड्या अन्नपदार्थावर ही धूळ जात असल्याने हे अन्नपदार्थ खाण्यासाठी कितपत सुरक्षित आहेत, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.
सहा महिन्यांत दीडशे वाहनांवर कारवाई
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून अशा वाहनांवर कारवाई केली जात आहे. 10 जून ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीत तीन चाकी व चार चाकी खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या 149 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र हे वाहनधारक पुन्हा त्या ठिकाणी वाहने उभी करून व्यवसाय करतात. तसेच या व्यावसायिकांना अतिक्रमण विरोधी पथकाची चाहूल लागताच ते दुकान बंद करून तेथून वाहने घेऊन जातात. परिणामी कारवाई करूनही पुन्हा परस्थिती जैसे थे होत असल्याचे चित्र आहे.
परिवहन कार्यालयातून अशा वाहनांना मोबाईल कॅंटिग म्हणून परवानगी दिली जाते. मात्र त्यांनी ते वाहन कुठे उभे करून व्यवसाय करायाचा याचे निर्देश दिले जात नाहीत. बेकायदा व्यवसाय करत असल्यास महापालिकेच्या वतीने त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच विनापरवाना वाहनांमध्ये काही बदल केल्यास अशा वाहनांवर आरटीओतर्फे कारवाई केली जाते.
– आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
वाहनातून बेकायदा ज्वलनशील घटक बाळगून खाद्यपदार्थ तयार करणे व विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात येत आहे. विक्री करणाऱ्या वाहनांवर अन्नपदार्थ सुरक्षा व फायर सेफ्टी ऍक्टनुसार कारवाई करण्यात येते. तसेच सिलिंडर जप्त करून वाहनांवर दंड आकारला जातो.
– शिरीष पोरेड्डी, प्रवक्ते स्थापत्य विभाग, पिं. चि. महापालिका.