माढ्याचा करिश्मा विधानसभेला चालणार? रामराजे कोणता डाव टाकणार?
सम्राट गायकवाड/सातारा: अठ्ठावीस वर्षांपासून ते नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपर्यंत “सबकुछ राजे गट’ असे वातावरण राहिलेल्या फलटण विधानसभा मतदारसंघात प्रथमच विरोधी पक्षाने कडवे आव्हान निर्माण केले आहे. राजे गटाने या मतदारसंघात विधानसभेच्या सलग पाच निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीला माढा लोकसभा निवडणुकीच्या निकालाची किनार आहे. फलटणचे रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे स्थानिक विधानसभा मतदारसंघ खेचून आणण्याचे आव्हान त्यांच्यापुढे देखील तितकेच आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही गटांकडून टाकले जाणारे डाव पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. निकालानंतर कोणत्या गटाचा उमेदवार विजयी होतो, त्यावरच प्रमुख नेत्यांची आगामी राजकीय कारर्किद अवलंबून असणार आहे.
फलटण तालुक्यात सन 1995 पूर्वीपर्यंत सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते. विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व कै. चिमणराव कदम, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व कै. हणमंतराव पवार, फलटण सहकारी दुध संघाचे नेतृत्व सुभाषराव शिंदे यांच्याकडे होते. दोन्ही सहकारी संस्थांचा सुवर्णकाळ फलटणकरांनी तेव्हा पाहिला. फलटण नगरपालिकेत सर्व विचारांचे नगरसेवक कार्यरत होते. मात्र, माजी आमदार चिमणराव कदम तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या धोरणांवर कायम कडवी टीका करायचे. पाणीप्रश्नावर कदम विधानसभेचे सभागृह दणाणून सोडायचे. परिणामी बारामतीच्या शेजारीच असलेल्या फलटण मतदारसंघाच्या आमदारांकडून होणारी टीका पवार यांना झोंबायची. दरम्यान, 1991 मध्ये राजे गटाने सक्रिय राजकारणास सुरूवात केली.
अर्थातच त्यामागे बारामतीकरांचे पाठबळ होते. फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत राजेगटाने एकहाती सत्ता प्राप्त केली व नगराध्यक्षपदी रामराजे नाईक निंबाळकर यांची निवड झाली.
पुढे 1995 ची विधानसभेची निवडणूक जाहीर झाली. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी साहजिकच सिटींग आमदार म्हणून चिमणराव कदम यांना चौथ्यांदा संधी दिली. तर दुसऱ्या बाजूला रामराजे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. कदम यांच्या 15 वर्षाच्या आमदारकीचा कार्यकाल पूर्ण झाला होता. परिणामी काही प्रमाणात कदम यांच्या विरोधात जनतेमधून नाराजीचा सूर होता व तो सूर राजेगटाला मिळाला. त्यामुळे राजेगटाची ताकद वाढली. मात्र, ती ताकद कदम यांचा पराभव करू शकेल इतकी नव्हती. पराभव करण्यासाठी कॉंग्रेसच्या व्होटबॅंकेची आवश्यकता होती. नेमकी ही बाब हेरण्यात आली व पुढे कॉंग्रेस उमेदवार चिमणराव कदम यांच्या प्रचारसभेला शरद पवार आले व त्यांनी कदम यांच्याच व्यासपीठावरून भाषणात सूचक विधान केले.
नेमक्या त्या विधानामुळे कॉंग्रेसची व्होटबॅंक राजेगटाकडे वळली अन चिमणराव कदम यांचा पराभव झाला. रामराजे यांचा विधानसभेच्या निवडणुकीत पहिला विजय झाला. पुढे 2009 पर्यंत तीन निवडणुकीत रामराजे यांचा एकहाती व प्रचंड मताधिक्क्याने विजय झाला. 2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाली व मतदारसंघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाला. तेव्हा राजेगटाच्या वतीने दीपक चव्हाण यांना 2009 आणि 2014च्या निवडणुकीत उमेदवारी देऊन विजयी करण्यात आले तर रामराजे ना.निंबाळकर यांना पक्षाने विधानपरिषदेचे सदस्यत्व बहाल केले.
एकूणच तब्बल पंचवीस वर्ष फलटण विधानसभा मतदारसंघावर राजेगटाचे वर्चस्व कायम राहिले. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत जोरदार राजकीय घडामोडी घडल्या. राजेगटाचे फलटण मतदारसंघातील एकमेव विरोधक रणजितसिंह नाईक निंबाळकर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली व तेथूनच फलटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला सुरूवात झाली. कोणत्याही परिस्थितीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण विधानसभा मतदारसंघातून मताधिक्क्य मिळू द्यायचे नाही, यासाठी राजेगटाने जंग पछाडले.
मात्र, तरीदेखील स्थानिक उमेदवार म्हणून मतदारांनी रणजितसिंह यांच्या पारड्यात झुकते माप टाकले. तर उर्वरित व विशेषत: माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाचे मताधिक्क्य मिळाल्यामुळे रणजितसिंह यांचा दणदणीत विजय झाला. केंद्रात दुसऱ्यांदा भाजपची सत्ता आली. त्यामुळे साहजिकच रणजितसिंह यांच्या वर्चस्व वाढीला सुरूवात झाली. फलटणमध्ये प्रथमच राजेगट वगळून दुसऱ्या पक्षाच्या नेत्याने आयोजित केलेल्या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित राहिले. एकूणच एका बाजूला रणजितसिंह यांच्या राजकीय कारर्किदीला खऱ्या अर्थाने सुरूवात होत आहे. तर दुसऱ्या बाजूला पंचवीस वर्षानंतर राजेगटापुढे प्रथमच सर्वच बाजूने आव्हाने निर्माण होत आहेत. राज्यातील कॉंग्रेस- राष्ट्रवादी पक्षाचे नेते भाजपमध्ये जाऊन जागा आरक्षित करत आहेत.
दरम्यान, रामराजे यांच्यादेखील भाजप- शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना ऊत येत आहे. परंतु अद्याप रामराजेंनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे बाळगलेले मौन आणि राजकीय अनुभव पाहता आगामी काळात रामराजे वेगळा डाव टाकण्याच्या तयारीत असणार हे नक्की आहे. तेव्हा त्या डावावर रणजितसिंह मात करू शकतील का, असा प्रश्न उपस्थित होणार आहे. कारण, राजेगटाकडे स्वत:ची कार्यकर्त्यांची एक ताकद आहे. दहा वर्षापूर्वीपासूनच राष्ट्रवादीचे कवच कमी करत मतदारसंघात राजेगट नावारूपास आणण्यास सुरूवात करण्यात आली.
राजेगटाकडे सद्यस्थितीत सर्वच स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक संस्था, दुध प्रकल्प अशा संस्थांच्या माध्यमातून मोठी व्होट बॅंक राजेगटाकडे आहे. त्या तुलनेत रणजितसिंह यांच्याकडे तालुक्यात संस्थात्मक वर्चस्व कमी आहे. दूध प्रकल्प, साखर कारखाना, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या माध्यमातून शहर आणि ग्रामीण भागात व्होट बॅंकेमध्ये काही प्रमाणात निश्चिपणे वाढ झाली तर लोकसभा विजयानंतर व्होट बॅंकेमध्ये गतीने वाढ होताना दिसून येत आहे. अशा परिस्थितीत फलटण विधानसभेची आगामी निवडणूक रंगणार आहे. ही निवडणूक केवळ विधानसभेची नसून दोन्ही गटप्रमुखांची पुढील राजकीय कारकीर्द ठरविणारी आहे. ज्या गटाच्या उमेदवाराचा विजय होईल. त्याच गटप्रमुखांचे
भविष्यात अच्छे दिन कायम राहणार आहेत.
उमेदवारीची संधी कोणाला?
राजेगटाने तिसऱ्यांदा दीपक चव्हाण यांना विधानसभेच्या निवडणुकीत उतरिवण्याची तयारी ठेवली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये फलटण माहेर असलेल्या व महाबळेश्वरच्या भाजपच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांचे नाव प्रामुख्याने पुढे येते आहे. शिंदे यांनी मागील काही महिन्यांपासून मतदारसंघात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यावर भर दिला आहे. तर रणजितसिंह यांचे समर्थक दिंगबर आगवणे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी न केल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे चव्हाण यांच्याविरोधात उमेदवार कोण, या प्रश्नाचे उत्तर महायुतीच्या जागावाटपानंतर स्पष्ट होणार आहे.
जयकुमार गोरेंची भूमिका निर्णायक
रामराजे आणि जयकुमार गोरे यांचे हाडवैर जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. त्याचाच परिणाम म्हणून गोरे यांनी रणजितसिंह माढा लोकसभा मतदारसंघात विजयी करण्यामागे महत्वाची भूमिका बजावली. गोरेंसाठी लोकसभेची निवडणूक ही सेमीफायनल होती. त्यामध्ये त्यांनी यश मिळविले. आता फलटण विधानसभा ही खऱ्या अर्थाने गोरे यांच्यासाठी फायनल आहे. तेव्हा फलटणचा उमेदवार निवडून आणण्यासाठी गोरे राजकीय ताकद पणाला लावणार हे निश्चित आहे. त्यासाठी फलटण मतदारसंघातील माळी आणि धनगर समाजाची मते प्राप्त करून देण्यासाठी गोरे यांचा प्रयत्न असणार आहे.
दहशत, रोजगार अन् पाणीप्रश्न
आगामी निवडणुकीत मतदारसंघातील वाढती गुन्हेगारी व गुंडांची व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांवर असणारी दहशतीचा मुद्दा अजेंड्यांवर असणार आहे. त्याचबरोबर रस्ते, युवकांना रोजगार अन पाणीप्रश्नावर पुन्हा एकदा यंदांची निवडणूक होणार आहे. आजपर्यंत मतदारसंघात किती युवकांना रोजगार मिळाला, धोम-बलकवडी अन नीरा-देवघर धरणाचे पाणी वितरण आणि मुलभूत सुविधांच्या प्रश्नांवर यंदाच्या निवडणुकीच्या प्रचारात खल होणार आहे.