श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील भाजपच्या 3 कार्यकर्त्यांच्या हत्येमागे लष्कर-ए-तोयबा ही पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हल्ला करण्यासाठी दहशतवादी ज्या कारमधून आले ती जप्त करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी भाजपच्या 3 कार्यकर्त्यांची गोळ्या घालून हत्या केली. ते कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला कारमध्ये बसले होते. त्यावेळी दुसऱ्या कारमधून आलेल्या 3 दहशतवाद्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर जवळून अंदाधुंद गोळीबार केला. त्या हल्ल्यात भाजप कार्यकर्ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी नेले जात असताना रुग्णालयाच्या वाटेवर त्यांचे निधन झाले. त्या हल्ल्याची जबाबदारी दी रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) नावाच्या गटाने स्वीकारली. तो गट तोयबाशी संलग्न मानला जातो. मात्र, हल्ल्याची पद्धत पाहून त्यामागे थेट तोयबा असल्याचे पोलिसांकडून सूचित करण्यात आले.
हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली कार तोयबाचा सदस्य असणाऱ्या स्थानिक दहशतवाद्याची आहे. मागील काही महिन्यांत भाजप नेते आणि कार्यकर्त्यांना लक्ष्य करून दहशतवाद्यांनी विविध हल्ले घडवले. ते हल्ले म्हणजे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा भाग असल्याचे पोलिसांना वाटत आहे.