मुंबई – आपल्या विविध मागण्यांसाठी विशेषत: वाढीव वीज बिलांच्या संबंधात मनसेचे नेते राज ठाकरे हे राज्यपालांना जाऊन भेटले होते. त्यावेळी या विषयी पवारांशी एकदा बोलून घ्या, सरकारचा निर्णय तेच घेत असतात असा सल्ला राज्यपाल कोशियारी यांनी राज ठाकरे यांना नुकताच दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांनी पवारांना फोन करून त्यांना ही माहिती दिली. खुद्द पवारांनीच आज पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
आज पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की मला ठाकरे यांचा फोन आला होता. राज्यपालांनी मला आपली भेट घेण्याचा सल्ला दिला आहे असं त्यांनी मला सांगितलं आहे. तथापि त्यानुसार तुम्ही राज ठाकरे यांना भेटणार काय असा सवाल पत्रकारांनी पवारांना विचारला असता पवार म्हणाले की, ते अजून काही ठरलेलं नाही. मी काही दिवस बाहेर जात आहे.
तीन-चार दिवस मी मुंबईत नसेन. पण राज्यपालांनी माझी भेट घेण्याचा सल्ला त्यांना दिला आहे एवढंच राज ठाकरे म्हणाले आहेत, असेही पवारांनी नमूद करीत प्रत्यक्ष त्यानुसार भेट होणार आहे की नाही या विषयी काहींच भाष्य केलेले नाही.
राज्यातील असंख्य नागरीकांना वीजेची वाढीव बिले आली आहेत त्या संबंधात राज ठाकरे यांनी राज्यपालांना निवेदन दिले होते. या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंतीही त्यांनी राज्यपालांना केली होती. त्यावेळी राज्यपालांनी या विषयावर पवारांशी बोला असा सल्ला राज ठाकरे यांना दिला होता.