नवी दिल्ली – राज्यात परतीच्या पावसाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातच आधीपासून मुबलक व स्वस्त दराने कांदा बियाण उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबवण्यासाठी केंद्र सरकारने आज तत्काळ कांद्याच्या बियाणे निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना जारी केली आहे.
राज्यासह कांदा उत्पादक राज्यांमध्ये कांदा बियाणाचा तुटवडा जाणवत आहे. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर स्वस्त दरात व मुबलक प्रमाणात कांदा बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारने बियाणांच्या निर्यातीवर बंदी घालावी, अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात होती. त्यातच परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पिकांची प्रचंड नासाडी केली. यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसला होता.