कालावधी : 20 मार्च 1987 ते 6 जून 1987
पिंपरी चिंचवड शहराची निर्मिती चार खेड्यांमधून झाली. चार खेड्यांचे मिळून आजचे महानगर झाले आहे. या महानगराच्या निर्मितीमध्ये कै. भिकू वाघेरे पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे दुसरे आणि दुर्दैवाने केवळ पाचच महिन्यांचे महापौर राहिलेल्या कै. भिकू वाघेरे पाटलांचे नाव या शहराच्या विकासदूतांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल! महापौर असतानाची त्यांनी केलेली कामे त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये केलेली कामे त्यांच्या दूरदर्शी निर्णयांची साक्ष देतात.
पाटील म्हणजे गावाचे प्रमुख. आपल्या गावातील माणसांचे सुख, दुःख, त्यांचे हित-अहित समजून घेणारे एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व… आपल्या छोट्या गावांना एकत्र करून त्याचे वैभवशाली महानगरीत रुपांतर करण्यासाठी वंशपरंपरागत चालत आलेल्या पाटीलकीचा सदुपयोग करून घेणारे कै. भिकू वाघेरे पाटील हे एक निराळेच पाटील ठरावेत ! पाटीलकीचा टेंभा न मिरवणे, सर्वांशी विनम्र आणि सौजन्यशील वागणे, परोपकारी आणि निस्वार्थीपणे समाजसेवा करणे या त्यांच्या अंगभूत गुणांना काळाची पावले ओळखण्याची दूरदृष्टी लाभल्यामुळे त्यांनी प्रत्येक संधीचं सोनंच केलं ! पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे दुसरे आणि दुर्दैवाने केवळ पाचच महिन्यांचे महापौर राहिलेल्या कै. भिकू वाघेरे पाटलांचे नाव या शहराच्या विकासदुतांमध्ये अग्रक्रमाने घ्यावे लागेल !
गावाच्या सरपंचापासून ते शहराच्या महापौरापर्यंतचा कै. भिकू वाघेरे पाटील अर्थात अप्पांचा प्रवास अतुलनीय आहे. चार गावांचे मिळून आजचे वैभवशाली शहर बनविण्यामध्ये त्यांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. तरुण वयात त्यांची पिंपरी वाघेरे गावच्या ग्रामपंचायतीवर निवड झाली. ग्रामपंचायतीचे सदस्य झाल्यावर ते पिंपरीचे सरपंच झाले. त्यानंतर चार गावांची मिळून नगरपालिका झाली.
कै. भिकू वाघेरे पाटील यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्यास कधी ओळख लागत नव्हती. कोणीही कधीही यावे, अप्पांचा दरवाजा सर्वांसाठी नेहमी खुला असायचा. चेहरा पाहून, नातीगोती पाहून आप्पांनी कधी काम केले नाही. पाटील घराणे असूनही त्यांनी ना कधी पाटीलकी गाजविली, ना पाटिलकीचा टेंभा मिरवला! कै. भिकू पाटील सरपंच झाल्यावर शासनाच्या धोरणानुसार कारखान्यांना नव्याने परवाने मिळाले होते. ज्या जमिनीत शेतकरी नांगर हाकत होते तिथे यंत्राचा आवाज घुमू लागला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीची जबाबदारी वाढली होती.
1970 मध्ये पिंपरी चिंचवड, आकुर्डी, भोसरी, येथील ग्रामपंचायती बरखास्त करून शासनाने नगरपालिका स्थापन केली. त्यावेळी अप्पांची नगरपालिकेवर सदस्य म्हणून निवड झाली. त्यानंतर पिंपरी चिंचवड नगरपालिकेची महापालिका झाली. निवडणूका झाल्या.
अनेक वर्ष काम करत असलेले कै. भिकू वाघेरे पाटील मार्च 1987 ला महापानगरपालिकेचे दुसरे महापौर झाले. गावचा सरपंच एक महानगराचा महापौर झाला. अप्पा महापौर झाल्यानंतर कामगार वर्ग खूष होता. मात्र हा आनंद अधिक काळ टिकला नाही. मार्चमध्ये महापौर झालेले आप्पा जून महिन्यामध्ये वैकुंठवासी झाले. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये व महापौर असतानाच्या पाच महिन्याच्या काळात त्यांनी केलेली अनेक मोठी आणि महत्त्वपूर्ण कामं आजही त्यांच्या दूरदर्शी निर्णयांची साक्ष देतात.
पवना नदीवरील पूल, रेल्वे ओव्हर पूल, भुयारी गटार योजना, जिजामाता रुग्णालय आदी मोठ्या कामांच्या आखणीमध्ये कै. भिकू वाघेरे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. क्रीडा आणि शिक्षण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत शाळांच्या विकासाकडे लक्ष दिले. त्याशिवाय त्याठिकाणी मोठी क्रीडांगणे उपलब्ध करून दिली. औद्योगिकीरणामुळे पिंपरी-चिंचवडचा शेतकरी बेरोजगार झाला. त्याची शेती गेली.
उपासमारीची वेळ आली. मात्र आप्पांनी त्यांना दिलासा दिला. आपल्या प्रेमळ आणि सौजन्यशील वागण्याने त्यांनी कारखानदारांचे मन वळविले, तरूणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. आप्पांची काम करण्याची हातोटी, विनयता, दूरदृष्टी यामुळे जनमानसात त्यांना आदराचे स्थान होते. कै. भिकू वाघेरे पाटील पश्चात त्यांनी आखून दिलेल्या आदर्शवाटांवर पाऊल ठेवत त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम त्यांचे चिरंजीव संजोग वाघेरे करत आहेत.