बारामती – अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील शेकडो वर्षाची परंपरा असलेला विजयादशमीचा सोहळा रद्द करण्याचे मोरगांव येथील समस्त ग्रामस्थ व मानकऱ्यांनी ठरवले आहे. दसऱ्याची शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, करोना विषाणूजन्य आजारामुळे “श्रीं’चा सीमोल्लंघन सोहळा न काढण्याचा निर्णय ग्रामस्थ व मानकऱ्यांनी घेतला असल्याची माहिती सरपंच निलेश केदारी यांनी दिली
बारामती तालुक्यातील मोरगाव येथे मयुरेश्वराचा विजयादशमी सोहळा संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. हा सोहळा पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातून भाविक येतात. हा उत्सव शेकडो वर्षापासून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. उत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण ग्राम प्रदक्षिणा व ग्रामदैवतांच्या भेटीस हा सोहळा पालखी, अबदागिरी, छत्री, सनई चौघड्याचा मंगलमई सूर, शोभेच्या फटाक्यांची आतषबाजी करीत मार्गक्रमण करीत असतो.
पालखीसमोर तोफांची सलामी दिली जाते. दशमुखी रावणाचे दहण, मोरया मोरयाचा जयघोष करण्यासाठी हजारोंच्या संख्येने भक्त बाजार तळावर एकत्र येतात. ग्रामप्रदक्षणा करीत असताना फिरंगाई माता गोंधळ, हरमळीचा खेळ, महादेव व गंगेची आरती, वंशावळ वाचन केले जाते. शिवकालात वाघू अण्णा वाघ हे सरदार पानसे यांकडे सेवेला असताना त्यांकडे तोफखान्याची जबाबदारी होती. यावेळी तोफा मयुरेश्वराला अर्पण केल्या होत्या. पैकी आजही पाच तोफा अस्तित्वात आहेत. “श्रीं’च्या पालखी पुढे तोफा उडवल्या जातात.
मात्र, करोनामुळे हा सोहळा रद्द करण्याचे ग्रामस्थांनी ठरवले आहे. सोहळ्यास परवानगी मिळण्याबाबत शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करूनही परवानगी न मिळाल्याने गावातील सर्व आजी, माजी पदाधिकारी, ग्रामजोशी, पुजारी यांनी बैठक घेऊन सोहळा रद्द करुन प्रशासनास मदत करण्याचे ठरवले आहे. विजयादशमी सोहळा रद्द झाला असल्याने दसऱ्यादिवशी भक्तांनी न येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.