नवी दिल्ली – करोनाव्हायरसमुळे होत असलेल्या कोव्हिड19 मधून एकदा बरे झाल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोनाची लागण होत नाही, असे म्हणणे चुकीचे असल्याचेही इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या नवीन केसेस कमी होऊ लागल्या आहेत.
मंगळवारी 47 हजारावर नवीन रुग्ण सापडले होते. तर बुधवारी हा आकडा पुन्हा वाढला असून 54,044 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. मृतांची संख्या कमी होत आहे, असे असले तरीही आयसीएमआरने मोठा इशारा दिला आहे.
युरोप, चीन, अमेरिका आणि रशियासह अन्य देशांच्या संशोधकांनी वेगवेगळी संशोधने केली आहेत. त्यांच्याकडे कोरोना व्हायरसविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीचा कालावधी वेगवेगळा सापडला आहे. पुण्यातील एनआयव्हीमध्येही वैज्ञानिक संशोधन करत आहेत. कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरामध्ये अँटीबॉडी बनू लागते.
यामुळे कोरोना बरा होत आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतीयांमध्ये अँटीबॉडी बनण्याचे प्रमाण मोठे आहे. मध्यंतरीच्या संशोधनात भारतात लहानपणी लसीकरण होत असल्याने कोरोनाचा धोका कमी असल्याचे सांगितले जात होते.
कोरोना झाल्यानंतर अँटीबॉडी वाढतात आणि कोरोना व्हायरसला विरोध करतात. मात्र, कालांतराने या अँटीबॉडी कमी होण्याची शक्यता असते. असे झाल्यास पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा इशारा आयसीएमआरने दिला आहे. दुस-यांदा कोरोनाची लागण होत नाही असे म्हणणे चुकीचे असल्याचेही आयसीएमआरने म्हटले आहे. यामुळे लोकांनी सावधानता बाळगावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, कोरोनाचे नवीनच संकट आहे. यामुळे यावर सर्व शक्यतांसाठी संशोधन होत आहे. यामुळे वेगवेगळ्या बाबी समोर येत आहेत. प्रत्येकाच्या शरिरातील अँटीबॉडी राहण्याचा काळ हा वेगवेगळा आहे.
काही अभ्यासांमध्ये तीन महिने तर काही अभ्यासांमध्ये पाच महिने अँटीबॉडी राहत असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अभ्यास आताही सुरुच आहे. मात्र, या अँटीबॉडी संपल्या की पुन्हा कोरोनाची लागण होण्याचा धोका असतो, असे भार्गव यांनी सांगितले.