दुबई – आयपीएल स्पर्धेत आज क्रमवारीतील अव्वल संघ दिल्ली कॅपिटल्स संघाशी राजस्थान रॉयल्सचा सामना होणार असून या सामन्यात विजय मिळवत स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्याचे आव्हान राजस्थानसमोर आहे.
आतापर्यंत झालेल्या सामन्यांत दिल्लीच्या फलंदाजांनी आपल्या कामगिरीने वर्चस्व राखले आहे. पृथ्वी शॉ, शिखऱ धवन, कर्णधार श्रेयस अय्यर व मार्कस स्टोनिस यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. अर्थात, या सामन्यांत त्यांना ऋषभ पंतच्या जागी नव्या खेळाडूला स्थान द्यावे लागणार आहे. पंत दुखापतीमुळे पुढील किमान एक आठवडा खेळू शकणार नसल्याचे दिल्ली संघ व्यवस्थापनाने सांगितल्यामुळे त्यांना त्याचा पर्याय अंमलात आणावा लागणार आहे.
धवननेही मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 69 धावांची खेळी करून आपण भरात येत असल्याचा इशारा दिला आहे. कर्णधार अय्यरने सुरुवातीच्या सामन्यांत चमक दाखवली असली तरीही नंतर त्याला सातत्य राखता आलेले नाही. त्याचे काही निर्णयही चुकल्याने त्यांना मुंबईविरुद्धचा सामना हातात असूनही पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे या सामन्यात तरी तो यशस्वी ठरतो का हे पाहणे महत्त्वाचे आहे.
गोलंदाजीतही त्यांनी अन्य संघांपेक्षाही वरचढ कामगिरी केली आहे. कागिसो रबाडा, अनरिच नोर्जे, रवीचंद्रन अश्विन यांनी आजवर झालेल्या प्रत्येक सामन्यात आपले वर्चस्व राखले आहे. अमित मिश्रा दुखापतीने उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने त्यांच्यासमोर संकट निर्माण झाले आहे. अर्थात, त्यांच्याकडे सशक्त सेकंड बेंचही आहे. त्यातही ईशांत शर्मा याला दुखापत झाल्यामुळे तो उर्वरित स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने त्यांची चिंता वाढली आहे.
राजस्थान संघाबाबत बोलायचे झाले तर संजू सॅमसन, कर्णधार स्टिव्ह स्मिथ व रियान पराग यांच्यावरच त्यांची फलंदाजी अवलंबून आहे. परागने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध राहुल तेवतियाला साथ देत संघाला विजय प्राप्त करून दिला होता. त्यामुळे आता राजस्थानला मधल्या फळीची चिंता राहणार नाही.
जोफ्रा आर्चरने गोलंदाजीसह फलंदाजीतही अफलातून कामगिरी केली असल्याने त्यांचा संघ तळातील फलंदाजांवरही मोठी धावसंख्या उभारू शकतो तसेच विजयासाठी पाठलागही करू शकतो. आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट यांच्याकडून दिल्लीला रोखले गेले तर राजस्थानसाठी विजय मिळवणे सोपे ठरेल.
तेवतियावरच मदार …
राहुल तेवतियाने हैदराबादचा पराभव करताना सातत्यपूर्ण खेळी केली. त्याने यंदाच्या स्पर्धेत आपला ठसा उमटवताना संघाला यशाच्या मार्गावर आणले आहे. आता याही सामन्यात त्याची बॅट तळपली तर राजस्थानचा संघ चमत्कार घडवू शकेल. तेवतिया यंदाच्या स्पर्धेत सापडलेला इंडिया मटेरियल खेळाडू असल्याचे सांगितले जात असून त्याच्या कामगिरीवर भारतीय संघाच्या निवड समितीचेही लक्ष राहणार आहे.