नवी दिल्ली – भारतात कोरोना संसर्गाच्या स्थितीत सुधारणा होत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. देशात आतापर्यंत 62 लाखांहून अधिक लोक कोरोनाच्या आजारातून बरे झाले असून ही संख्या संपूर्ण जगात जास्त आहे.
तपासण्या वाढवण्यात आल्यानंतरही कोरोना पाॅझिटिव्हचा दर कमी होत आहे, हे चांगले संकेत आहेत. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे.
भारतात अॅक्टिव्ह रूग्ण संख्या ही काही दिवसांपासून 9 लाखाच्या आत आहे.
तपासण्या वाढवल्यानंतरही पाॅझिटीव्ह रूग्णांचा दर कमी आहे यावरून समजले जाऊ शकते की, कोरोना संसर्गाची गती आता कमी होत आहे.
87 टक्के रूग्ण झाले बरे, मृत्यू दर 1.53 टक्के
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, भारतातील एकूण संक्रमित रूग्णांपैकी जवळपास 87 टक्के रूग्ण बरे झाले आहेत. रूग्णालयात असलेली आणि घरी क्वारंटाईन असलेली अशी एकूण अॅक्टिव्ह प्रकरणे ही केवळ 11.69 टक्के आहेत. तसेच मृत्यूदर हा 1.53 टक्के आहे.