मुंबई – पॉवर ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने आज सकाळी सव्वादहाच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला. तांत्रिक बिघाड शोधून वीजपुरवठा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी यंत्रणेला तब्ब्ल अडीच तास कसरत करावी लागली. दरम्यान, देशाच्या आर्थिक राजधानीत एकाचवेळी अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने विरोधकांनी ठाकरे सरकारवर चांगलाच निशाणा साधला.
भाजप नेते नितेश राणे यांनी देखील खंडित वीजपुरवठ्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं. याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ट्विट करताना राणे यांनी, ‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी बसल्या पासुन जे कधी नाही ते सगळ होत आहे. आता काय फक्त डायनासोर आणि एलियन दिसायचे राहिले आहेत. ते ही दिसतील कदाचीत.’ असा टोला लगावला.
काय पायगुण आहेत या मुख्यमंत्र्याचे !!
बसल्या पासुन .. जे कधी नाही ते सगळ होत आहे ..
आता काय फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले आहेत..
ते ही दिसतील कदाचीत..
पनवती!!!— nitesh rane (@NiteshNRane) October 12, 2020
दरम्यान, याबाबत बोलताना उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी, ‘महापारेषणच्या 400 के.व्ही. कळवा पडघा जीआयएस केंद्रात सर्किट 1 ची दुरूस्ती सुरू होती. त्यामुळे सर्व भार सर्कीट 2 वर पडला. मात्र, सर्किट 2 मध्येही अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला.’ अशी माहिती दिली.